व्याख्यानमाला-१९७६-५

परंतु भारतीय समाजाला निश्चित दिशा देण्याचं कार्य या देशामध्ये, स्वातंत्र्यानंतर पंडितजीच्या नेतृत्वानं केलं. पं. जवाहरलालांसारख्या अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या विचारवंताचं नेतृत्व या देशाला मिळालं हे मी मोठं भाग्याचं समजतो. त्याचे कारण असे आहे की जगाच्या इतिहासाचे, जगात होणा-या सगळ्या घडामोडींचे, जगातील बहुतेक सगळ्या राष्ट्रांचे अत्यंत जवळून दर्शनच केवळ – घेतलं होतं असं नव्हे-, तर त्याच्या विचारांचा, त्यांनी कप्प्यांना हात घालून ते अलगदपणे उलगडलेलें होतं आणि हे विचार नीट समजून घेऊन त्यांनी ते आपल्या देशामध्ये कसे आणता येथील त्याची काही एक निश्चित कल्पना त्यांच्या मनामध्ये होती. माझं विधान कदाचित काही लोकांना अतिशयोक्तीचं वाटेल. परंतु भारतीय स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जर आपण पाहिला, भारतीय लोकशाहीची वाटचाल पाहिली, भारतीय समाजवादाच्या कल्पनेचा विस्तार पाहिला, भारतीय जीवनप्रणाली संबंधाने आपण जवळून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रत्येकावरती पंडितजींच्या विचारांची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे. आणि याचे कारण तुमच्या लक्षात येईल की त्या काळात स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये इतर कितीही लोकांनी जरी भाग घेतलेला असला तरी स्वातंत्र्याबरोबरीनंच स्वातंत्र्यानंतर या देशाची आर्थिक पुनर्रचना, समाजिक पुनर्रचना, सांस्कृतिक पुनर्रचना कोणत्या तत्त्वाच्या आधारावर  होणार आहे. त्याचंही निश्चित स्वरूप मनाशी ठरवलेला, महात्माजीनंतरचा हा दुसरा नेता होता. महात्माजी हे विरक्त प्रवृत्तीचे, अध्यात्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात उतरले नाहीत. त्यांचा हात आशीर्वादासाठी नेहमीच सत्ताधा-यांच्या पाठीशी राहिला. आणि म्हणून पंडीतजींवरती ही अधिक महत्त्वाची जबाबदारी पडल्यामुळे जगाचा इतिहास बघत असताना त्यांना जाणवलं. जे होतं त्यांच्या चुका पाहून त्याचं सामर्थ्य काय? त्याचं दौर्बल्य काय हे लक्षात घेऊन त्यांनी या देशाला दिशा लावण्याचा प्रयत्न केला अणि या देशामध्ये त्यांनी एक चांगली गोष्ट केली की कुठल्याही तात्त्विक निष्ठेच्या आत्यंतिक आहारी न जाता म्हणजे मार्क्सवाद घ्या, जर्मनीमधला नाझीवाद घ्या फँसिस्ट ज्याला आपण म्हणतो – किंवा पश्चिम युरोपातील अनेक राष्ट्रांमध्ये असलेला भांडवलदार घ्या – अशा कुठल्याही आत्यंतिक विचारप्रणालीचा स्वीकार न करता या सगळ्या विचारप्रणालीमध्ये असलेलं समाजकल्याणाचं जे जे काही असेल तेच स्वीकारण्याची पुरोगामी वृत्ती पंडितजीनी प्रारंभीच्या आपल्या रचनेमध्ये दाखविली. त्यांच्या, विचारामध्ये हा असा एक संगम झालेला होता. आणि म्हणून या देशातील समाजाच्या परिवर्तनाची दिशा ही जगाच्या दृटीने काही विचारांची झापडे बांधलेल्या लोकांच्या दृष्टीनेही कदाचित अत्यंत मागासलेली वाटण्याची शक्यता आहे. कदाचित दिशाहिन ठरण्याची शक्यता आहे. निश्चित काही तरी स्वीकारा, कम्युनिझम तरी स्वीकारा, हुकूमशाही तरी स्वीकारा, वा भांडवलशाही तरी स्वीकारा, एक काही तरी स्वीकारा, ह्या सगळ्यांचं कडबोळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे घोटाळा होतोय असं म्हणणा-या लोकांची संख्या या देशामध्ये होती.

असं असताना सुध्दा मानवतेसंबंधीचा अत्यंत मूलभूत विचार केलेला असल्यामुळे पंडितजी आपली स्वत:ची आवडती तत्त्वं काही क्षणाला बाजूला ठेवून इतरांची मने समजावून घेऊन त्यांनाही सामावून घेत. अशा प्रकारचा एक समन्वयवादी दृष्टीकोन भारताच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणला. घटनेमधेसुध्दा जगातल्या सगळ्या चांगल्या प्रवृत्तींचं दर्शन घडतं समाजवादाची कल्पना मार्क्सकडून ते शिकले. हेरॉल्ड लॉस्कीसारख्या मार्क्सचा नवा भाष्यकार, नवा अर्थ सांगणारा, त्याच्या कडून ते समाजवादाची संपूर्ण संकल्पना काय ते शिकले. पश्चिम युरोपमध्ये वाढीला लागलेल्या उदारमतवादातून निर्माण झालेली लोकशाहीची मूल्ये, व्यक्तिस्वातंत्र्याची मूल्ये, बुध्दिवादाची मूल्ये, ऐहिकतेची मूल्ये – तीही ते शिकले आणि भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेल्या, इथल्या समाजरचनेतील काही चिरंतन अशा तत्त्वांचाही त्यांनी अभ्यास केला असल्यामुळे आणि विशेषत: गांधीजींच्या आशीर्वादाचा हात त्यांच्या पाठीशी असल्यामुळे, इथल्या खेड्यांतून, इथल्या बहुजन समाजाच्या जीवनातून जी कामगिरी आपणाला घडवायची आहे. त्यामधून इथलीच काही तत्त्वं अंतर्भूत केली पाहिजेत असे समजून तीही तत्वं असं सगळया गोष्टींचं संमीलन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अशी ही एक समन्वयवादी अशा प्रकारची दृष्टी भारतीय राजकारणामध्ये आणली. म्हणजे भारतीय समाजाच्या परिवर्तनामध्ये कुठलेही निश्चित अशा प्रकारचं ठोक अगर ठोस तत्त्वज्ञान न स्वीकारता, जगातल्या सगळ्या चांगल्या अशा गोष्टी एकत्र करून समाजाला पुढे नेण्याचं व्रत त्यांनी अंगीकारलं – त्यात ते कितपत यशस्वी झाले, त्यामध्ये त्यांना किती अडथळे आले, त्यांचे किती पराजय झाले हादेखील इतिहासाचा, चर्चेचा एक विषय आहे परंतु त्यामुळे त्यांच्या हेतूची शुध्दता, त्यांच्या हेतूची परिणामकारकता, त्यांच्या कल्पनांची सत्यता खोटी ठरत नाही.