अभिनंदन ग्रंथ - यशवंतरावांचें वर्धिष्णु व्यक्तिमत्त्व

यशवंतरावांचें वर्धिष्णु व्यक्तिमत्त्व

य. कृ. खाडिलकर, संपादक – नवाकाळ

१९५५ चा दहा ऑक्टोबर, १९५६ चा एक नोव्हेंबर आणि अविस्मरणीय आहेत. पहिल्या निर्दिष्ट तारखेस रा. पु. कमिशनने मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या सुखस्वप्नांची राखरांगोळी केली, आणि त्यांतून महाराष्ट्राला पेटविण्या-या आगीच्या ज्वाळा उसळल्या. दुस-या निर्दिष्ट तारखेस गुजराथशीं विदर्भ-मराठवाड्यासह महाराष्ट्राचा राक्षसविवाह झाला व समिती-कांडांत तो अविचल राहिला. तिस-या निर्दिष्ट तारखेस पं. नेहरुंच्या आशीर्वादाने व ना. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या अतीव उत्साह-आनंदांत मुंबईसह महाराष्ट्र साकार झाला. जें होतें तें चांगल्या साठीच असें जसा काळ जातो तसें कळून चुकतें. संयुक्त महाराष्ट्राच्या दोन तारखा वांझोट्या गेल्या, आणि विशिष्ट परिस्थितींत मुंबई-सह महाराष्ट्र तिस-या तारखेस अस्तित्वांत आला, ही घटनाहि सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर लोकशाही महाराष्ट्राला उपकारक व धार्जिणी अशीच वाटते.

मागणी केल्यावर ती आयती मिळाली आणि समाजाच्या सर्व थरांचे एकात्म्य त्या मागणीशीं झालेलें नसलें तरी मागणी पुरी झाल्यावर त्याबद्दलची अपूर्वाई व जिवंत जपणूक पुढे टिकतेच अशांतला भाग नाही, आणि विशिष्ट लोकांची मक्तेदारी प्रस्थापित होण्याचाहि धोका असतो. रा. पु. कमिशनच्या अहवालांतच महाराष्ट्राची मागणी पुरी झाली असती तर काय झालें असतें ? याचें चित्र जरासें डोळयांसमोर आणून पाहण्यासारखें आहे. संयुक्त महाराष्ट्र परिषद आणि तिचे जवळजवळ सर्वाधिकारी अध्यक्ष श्री. शंकरराव देव यांच्याकडे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचें नेतृत्व होतें. त्यांच्याशिवाय सं. म. परिषदेचें पान हलत नव्हतें. आणि इतर पक्ष जवळजवळ निर्माल्यासारखे या परिषदेंत होते. दोनचार लाखांच्या सभा श्री. शंकरराव देव यांच्या शब्दावर रा. पु. कमिशनच्या अहवालापूर्वी आणि नंतरचे कांही महिने झुलत होत्या. श्री. शंकरराव देव म्हणतील तें धोरण, तोरण व ऐरण अशी यावेळची स्थिती होती. सा-या महाराष्ट्राचीं सूत्रें आपल्या मुठींत असलीं पाहिजेत, आणि कोणाचाहि भलाबुरा ललाटलेख लिहिण्याचें सटवाईचें सामर्थ्य आपल्या फटका-यांत असलें पाहिजे, अशी श्री. देव यांची महत्त्वाकांक्षा कळसाला पोहोचण्याचा तो एक त्यांच्या दृष्टीचा सुवर्णक्षण होता. 'ना. चव्हाण उतले मातलेले दिसतात, त्यांना फेकून दिलें पाहिजे' अशा प्रकारची भाषा याच ऐन सद्दीच्या काळांत श्री. शंकरराव  देव यांनी काढली, आणि 'बघू कोण कोणाला फेकून देतो ते' असें प्रत्युत्तर त्यांना मिळालें अशी वदंता आहे. श्री. शंकरराव देव यांची कृपा महाराष्ट्रांत ज्याच्यावर होईल त्याचें भाग्य फळफळतें, व ज्याच्यावर वक्रदृष्टि होईल त्याचा एकाकी अवस्थेंत निर्माल्य होतो, असा वचक व दरारा निर्माण करण्याची जिद्द १९५५ साल मावळतांनाच संपली. 'मुंबईत ना. चव्हाणांकडे व दिल्लींत पं. नेहरूंकडे मला कोणी विचारीत नाही. काशीवास मी पत्करला यांतच काय तें समजा.' अशा प्रकारचे उद्गार श्री शंकररावांना १९६१ सालीं काढावे लागले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. चव्हाण झाले आहेत. काळ कोणाचा नक्षा केव्हा व कसा उतरवील याचा नेम नसतो. एका पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या आहारीं राज्याचें एकूण कर्तृत्व असण्यासारखी दुसरी कोणतीहि लोकशाहीला घातुक अशी घटना असूं शकत नाही. १९५५ सालीं महाराष्ट्र राज्य रा. पु. कमिशनने पाळण्यांत घातलें नाही, आणि जणू कांही महाराष्ट्रीय लोकशाहीवरचा फार मोठा धोकाच टाळला..