व्याख्यानमाला-१९८६-३१

व्याख्यान दिनांक - ४-१०-१९८६

विषय - "महाराष्ट्र दिशाहीन होतो आहे काय?"

व्याख्याते - मा. श्री. रायभानजी जाधव, माजी आमदार व चेअरमन कन्नड सहकारी साखर कारखाना लि. कन्नड, जि. औरंगाबाद.

व्याख्याता परिचय -

नेतृत्त्वात वारंवार बदल होत गेल्यामुळे गेल्या पांच-सात वर्षात महाराष्ट्राची शेती, सिंचन, उद्योगधंदे, मनुष्यबळ निर्मिती आणि विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात कशी परागती होत आहे याचे विदारक चित्रण या व्याख्यानात केलेले आहे.

गेल्या पांच-दहा वर्षात जे प्रांत विकासाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या तुलनेत कुठेच नव्हते ते आज आपल्या विकासाचा वेग महाराष्ट्रापेक्षा अधिक वाढवत आहेत – पुढे जात आहेत. खरे म्हणजे मुळातच ताकदवान असलेला महाराष्ट्र ही गती इतरांपेक्षा सहज जास्तीची ठेवू शकला असता. असे का घडले नाही याचे संक्षिप्त विवेचन ‘महाराष्ट्र दिशाहीन होतो आहे काय?’ या विषयावरील व्याख्यानाद्वारे इथे करण्याचा लेखकाने (वक्त्याने) प्रयत्न केलेला आहे.

नांव - श्री. रायभानजी जाधव

शिक्षण – हिंदी ‘साहित्य विशारद’ १९५७ सर्वप्रथम, मराठी ‘साहित्य आचार्य’ १९६१ महाराष्ट्रात सर्वप्रथम, बी. ए. (ऑनर्स) १९६३ सुवर्णपदक विजेते, एम्. ए. (मुंबई विद्यापीठ) सर्वप्रथम-सुवर्णपदक विजेते.

जन्म – १९४२ साली. सामान्य शेतकरी कुटुंबात.

* १९६४ साली डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड. १९७३ अखेर महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून काम.

* १९७५ ते १९७६ पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी. नंतर सरकारी नोकरीचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश.

* १९८० साली विधीमंडळ सभासद म्हणून निवड.