व्याख्यानमाला-१९८६-३०

दिल्ली दरबारातील यशवंतरावांचे कार्य विचारात घेतले तर त्यांच्या पदरी काही यश पडते त्याचप्रमाणे अपयशाचेही ते धनी झालेले आढळून येतात. त्यांच्या कारकीर्दीत काही चांगल्या गेष्टी घडल्या तशाच काही अनिष्ट घटनाही घडल्या. पण त्यांचा साकल्याने विचार करताना मला असे मात्र म्हणावेसे वाटते की या कालखंडात जर यशवंतराव बोलके झाले असते तर त्यांच्या कार्याला निःसंशय फार मोठा उठाव मिळाला असता. त्यांच्याबद्दल माझा आक्षेप होता- आणि जो मी वेळोवेळी त्यांच्यापुढे प्रकटही करीत असे- तो हा की काँग्रेसमधील एक विचारवंत म्हणून त्यांनी जे विचार प्रकट करावयाला पाहिजे होते, जी भाष्ये करावयाला पाहिजे होती, ज्या विचारमंथनाला चालना द्यावयाला पाहिजे होती ते ऐतिहासिक कार्य त्यांनी कधीच पार पाडले नाही. माझे असे ठाम मत आहे की काँग्रेसमध्ये नेहरूंच्या नंतर विचार मांडणारा एकच नेता होता तो म्हणजे यशवंतराव चव्हाण हेच होत. त्यांनी विचार मांडू नये हे मला मुळीच पटले नाही. कदाचित चीनच्या आक्रमणाच्या बाबतीत त्यांनी जो विचार मांडला होता तो नेहरूंना पटला नाही हे त्यांनी पाळलेल्या मौनाचे एक कारण असू शकेल. तेव्हापासून यशवंतराव यांची एकच भावना झाली की आपल्याबद्दल जो संशय निर्माण झाला आहे, काहीसे जे किल्मिश निर्माण झाले आहे ते उगाच बोलून वाढवू नये. त्या दृष्टीने त्यानी आपले विचार मनातच ठेवले आणि पुढील काळात त्या विचारांना कधी वाचाच फोडली नाही.

यशवंतरावांनी जे मौन पाळले त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. गोव्याला भाऊसाहेब बांदोडकर स्मृति व्याख्यानमाला आम्ही सुरू केली. त्या व्याख्यानमालेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. जयंतराव नारळीकर, राजा रामण्णा यांच्यासारख्या विद्वानांनी आणि शास्त्रज्ञांनी व्याख्यानपुष्पे गुंफली. त्यावेळी यशवंतरावांना मी सतत आग्रह केला की त्यानी आपले विचार मांडावे. राजकारणाचा नसला तरी समाज धारणेचा समाजपरिवर्तनाचा कोठलाही विचार त्यांनी मांडावा ही माझी इच्छा होती. पण यशवंतरावांनी आमची विनंती मान्य केली नाही आणि आपला विचार मांडला नाही.

मला निश्चितपणे असे वाटते की यशवंतरावांनी विचार मांडला असता तर नेतृत्वाला आणि अनुयायांना दिलासा मिळाला असता आणि कदाचित पुढे जे महाभारत घडले ते घडलेही नसते. त्यांच्यासारखा विचार देणारा माणूस गप्प राहिला, त्याने मौन धारण केले हे सुद्धा देशाच्या दृष्टीने एक दुर्दैवच होय असे मी समजतो. देशाचा विकास होण्याच्या दृष्टीने यशवंतरावांच्या सारखा विचारवंत आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा या सर्व विषयांवर अधिकारवाणीने बोलू शकला असता. ते बोलले नाहीत आणि त्यामुळे वैचारिक दृष्टीने एक पोकळी निर्माण झाली. ऐतिहासिक दृष्टीने आणि विचारांच्या दृष्टीने ती पोकळी आता कधीच भरून येणार नाही. यशवंतराव यांच्यासारखा एक विचारवंत, खंदा राजकारणी पुरुष, ज्याला गांधी, नेहरू, रॉय यांच्यासारख्या विभूतींचा वारसा लाभलेला होता तो आज पडद्याआड झाला आहे. त्यांची स्मृती तेवढी आज आपल्याला आधार तशीच स्फूर्ती देणार आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या व्याख्यानमालेचा शेवट करीत आहे.

धन्यवाद!