महाराष्ट्रातील दुष्काळ - १२८

उत्तरेमधला शेतकरी चांगले पीक घेतो.  तो अभिमानाने उभा राहातो; म्हणजे दहादहा वीसवीस हजार डोचकी एका प्रश्नावर आंदोलनासाठी उभी राहातात.  कमिशनरांच्या कार्यालयावर घेराव करून वेडे करून सोडतात.  मग राष्ट्रीय-बजेटमध्ये पाणी प्रश्न व त्यासंबंधी खर्च ह्याचा अंतर्भाव खासदार करत नसतील तर शेतकर्‍यांने संघटितपणे उभे राहाण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.  मी ते बरोबर आहे असे मानेन.  तरच गंगेचे पाणी कावेरीकडे येईल.  याच्याकरता जी इच्छाशक्ती लागेल त्या इच्छाबळाचा अभाव सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वामध्ये मला दिसतो.  पाणी हा एवढा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, असे जर आपण नुसते म्हणत राहिलो तर हा प्रश्न सुटणार नाही.  त्याच्यासाठी संघर्षाची सुरूवात करावी लागेल.

५० वर्षानंतर तरी पाणी मिळेल ?

माझे असे म्हणणे आहे की, आपल्याला जर सुरवात करायची असेल तर गंगाखोर्‍यापासून पाणी दक्षिणेकडे वळवणे ही मोहीम सुरू करा.  त्यामुळे सुरू केली तर ५० वर्षानंतर का होईना पुढच्या पिढीला तरी हक्काचे पाणी मिळेल.  ते हक्कामुळेच मिळाले असेल.  आणि ते पाणी हक्काने मिळण्याची तरतूदही करून ठेवावी लागेल.  तेव्हा याची सुरवात महाराष्ट्राने करावी.  पण अलीकडे लोक असे म्हणतात की महाराष्ट्रातले पाणी संपलेले आहे.  त्याच्यामुळे दिल्लीत पाणी योजना नाही.  कोण फिकीर करतो महाराष्ट्रात पाणी आहे की नाही ?  कोणी पर्वा करत नाही की कावेरीकडे गंगा कशी आणायची.  याचा विचार जाणीवपूर्वक जर केला तर माझ्यासारखा कास्तकार समाजांतील माणूस आपल्याबरोबर या चळवळीमध्ये साथीला रहाणार आहे.  आम्हाला शेती आहे की नाही याच्याशी आमचा संबंध नाही.  आम्हाला पाणी मिळो वा न मिळो.  यातही रस नाही.  पण तुमच्या शेतामध्ये पिकले जावे ही माझी मोठी व खूप इच्छा आहे.  ह्यासाठी चळवळव संघर्ष करावा लागेल.  तो संघर्ष करण्याची चर्चा ह्या शिबिरामध्ये होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो.

मला बोलायची संधी दिली या बद्दल सगळ्यांचे आभार मानतो.