महाराष्ट्रातील दुष्काळ - १२३ (2)

१०.  दुष्काळावर कायम मात करावी हेच ध्येय ठेवा

डॉ. सुभाषचंद्र भोसले
भूगर्भशास्त्रातील संशोधक
सध्या प्रमुख कार्य सचिव, रयत शिक्षण संस्था, (सातारा)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पावसाळा अवर्षण काळाने ग्रासायला प्रारंभ झाला आहे.  ते होऊ गेल्यास माणसे, जनावरे पीक हे सर्व मरायला लागेल.  त्यावर केवळ तात्कालीन उपाय करू नये.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'मी भौतिक शास्त्राचा विद्यार्थी आहे.  विशेषतः पी.एच.डी.साठी ५-६ वर्ष भूगर्भशास्त्राचा पाण्यावर काही अभ्यास केला; त्यावेळी काढलेल्या निष्कर्षावरून जी आकडेवारी अभ्यासातून समोर आली, ती जाणकारांच्या विचारांसाठी मी मांडतो आहे.

आपल्याला कल्पना आहे, की सन १९७१-७२ साली अनन्यसाधारण असा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला.  त्या दुष्काळामध्ये ७५ ते ८० हजार विहिरी पाडल्या गेल्या.  पण त्यांच्यापैकी त्यावेळी ५५ ते ६० हजार विहिरींना अजिबात पाणी लागले नाही.  त्याच्यानंतर त्यातील काही विहिरींना पाणी लागले.  महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला तर सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकणचा हमखास पाऊस पडणारा जो पट्टा आहे आणि त्यानंतर पूर्वेस ४० ते ७० मैलाचा उभा असा पट्टा आहे, तो दुष्काळाचा पट्टा होय.  हा फारच व्यापक प्रश्न आहे.  म्हणून ह्याविषयी कायम विचार करण्याची मुख्यत्वे आज गरज आहे.  परंतु आज आपल्याला असे दिसून येते की दुष्काळ पडल्यानंतर आपण विचार करू लागतो.  काही इलाज झाला असे दिसते.  परत दुष्काळ-विचार आपला मागे टाकतो.  आणि विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळांमध्ये ब्रिटिशांनी दुष्काळ निवारणांचे जे धोरण आखले होते तेच थोड्या फार प्रमाणात आजही राबवलेले जाते.

दुष्काळग्रस्त पट्ट्याबाबत भौगोलिक दृष्ट्या स्पष्टीकरण असे की अरबी समुद्रावरून येणारे ढग सह्याद्रीमुळे अडतात.  ढग असल्यामुळे पाऊस पडतो.  ह्याच्या पलीकडचा पट्टा हा कायम स्वरूपात दुष्काळी पट्टा आहे.  सध्या शासनाचे धोरण असे आहे की दुष्काळ पडला रे पडला की तेवढ्या काळापुरती दुष्काळ हा कशाही तर्‍हेने निभवायचा !  त्याच्यातून अरिष्टातून कसेतरी बाहेर पडायचे.  एक भ्रामक कल्पना करून घ्यायची की पुढच्या वर्षी काही दुष्काळ पडणार नाही !  नक्कीच सातत्याने पाऊस पडणार आहे.  पण अशी अवस्था रहात नाही.  दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ हा पडणारच असतो.  त्या दृष्टीने मात्र महाराष्ट्र शासन अजून जागे झालेले नाही, आणि निवारणाबद्दलही परिणामकारक धोरण आखणी केलेली दिसत नाही.