भाग १ विधानसभेतील भाषणे-७०

मला असे सांगण्यात आले की सातारला फार गडबड झालेली आहे, त्यापासून आपणाला फारच सावध राहिले पाहिजे आणि त्यामुळे देशावर एखादे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. याबद्दल, अध्यक्ष महाराज, मी एवढेच सांगू शकेन की देशावर कोणत्याही प्रकारचे संकट येणे शक्य नाही. ही एक लहान गडबड होती. थोडक्यात त्याची माहिती अशी आहे की, ''मुसलमानांची दोन तीन तरुण मुले रस्त्यावर बसली होती. त्याच बाजूने २ किंवा ३ आर.एस्.एस्. मध्ये काम करणारी मुले चाललेली होती. त्याना असे वाटले की ही जी मुसलमानांची मुले बसलेली आहेत, ती कदाचित काही तरी खोडी करण्याकरिताच बसलेली असावीत. त्यांनी त्या मुलांना दम दिला आणि त्यांना एक दोन धक्के दिले. ती मुले त्यांना म्हणाली असावी की आम्ही याचा बदला घेऊ. पोलीस खात्याला ही हकीगत समजलीच नाही. दोघांपैकी कोणीच पोलिसांकडे तक्रार घेऊन गेलेला नाही. दुसर्‍या दिवशी मुसलमान मुलांनी बरोबर चार पाच माणसे घेतली आणि परत त्यांच्यात बाचाबाची झाली, मारपीटही झाली. पण मला ही गोष्ट समजत नाही की यामध्ये हिंदुस्थानचा राष्ट्रवाद कुठे आला ? जे घडले असेल ते गैर घडले असेल असे म्हणावयाला मला काहीच संकोच वाटत नाही. त्यांच्यावर खटला भरला जात आहे. आपण अशा किरकोळ प्रश्नामध्ये राष्ट्रावर संकट आले, हा फार मोठा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे, अशा प्रकारची चिंता करू लागलो तर मला असे म्हणावयाचे आहे की आपल्याला राष्ट्राच्या खर्‍या प्रश्नाच्या वेळी चिंता करण्याकरिता वेळच राहणार नाही. 

मी अशी विनंती करू इच्छितो की, आमचा जो हा विचार आहे, तो प्रजासोशियालिस्टांना आणि कम्युनिस्टांना मंजूर होता. यांना देखील तो मंजूर झाला असता, परंतु त्या दिवशी ते नव्हते. त्यांची माझी गाठही पडली नाही. माझा सांगण्याचा मुद्दा असा की, महाराष्ट्राची जी घडण आहे, ती फार मजबूत अशी आहे. मी असेही सांगू इच्छितो की, ह्या सह्याद्रीची छाती फारच बळकट आहे. असे म्हटले जाते की मुसलमानांत फ्रस्ट्रेशनची भावना आहे. त्या फ्रस्ट्रेशनचा आपण उगाच एक बागुलबुवाच करून बसलो आहोत. मुसलमानात जी दुःखाची भावना आहे, ती आम्ही समजून घेतली पाहिजे. वडील भाऊ या नात्याने आमचे ते कर्तव्यच आहे. मुसलमानात फ्रस्ट्रेशन आहे, हा सुध्दा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण ती फ्रस्ट्रेशनची भावना वाढू देता उपयोगी नाही. कारण त्यामुळे त्यांच्या नॅशनॅलिजमच्या फीलिंगवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तसे पाहिले तर फ्रस्ट्रेशनची भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक समाजामध्ये काम करणार्‍यामध्ये नेहमी असतेच. लेबरर्समध्ये काम करणार्‍या श्री. बर्धन यांच्यामध्येही तशा प्रकारची ती भावना आहे. शेतकर्‍यासंबंधी मी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्यामध्ये तशी भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र ती भावना वाढू देता उपयोगी नाही. याचे सोल्युशन दुसरे आहे.  नैराश्याची भावना जी मुसलमानांच्या मनामध्ये आहे, ती तुम्ही आम्ही दूर केली पाहिजे. त्यासाठी आपण कोणालाही विनाकारण अँन्टी नॅशनल म्हणता उपयोगी नाही.

अध्यक्ष महाराज, कम्युनिस्ट पक्षांविषयी आमचे मूलभूत मतभेद नाहीत. चीनच्या बाजूने ते काही तरी करू शकतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती चुकीची आहे असे मी म्हणेन. परंतु येथे असे सुचवावयाचे आहे की, त्यांना जे काही बोलावयाचे आहे ते त्यांनी स्पष्ट रीतीने बोलले पाहिजे. तसे जर ते करतील तर बरे होईल. आमचा देखील मानवतावादावर विश्वास आहे. आमचे नॅशनॅलिजम एक्सक्ल्युजिव्हली भाईबंदाचे होते. आम्ही हिन्दी चिनी भाई भाई असे म्हटले, परंतु त्याच एका भाईने आमचा विश्वासघात केला, यात मात्र संशय नाही.