भाग १ विधानसभेतील भाषणे-४७

गोळीबारासंबंधी त्यांनी आपले जे मत दिले ते मी सभागृहाला सांगितले आहे. एक गोष्ट खरी आहे की जातीय दंग्याच्या बाबतीत एक विलक्षण परिस्थिती निर्माण होते आणि ज्या काही पूर्वकालीन भावना असतात, जो काही अभिमान असतो किंवा स्थानिक परिस्थिती असते ती पुढे करून हा दंगा करण्यात येतो. अशा वेळी पोलिसांना गंभीरपणे काम करावे लागते. तेव्हा हा जो प्रकार घडला तो वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर पोलिसांनी गोंधळून जाण्यासारखे त्यात काही होते असे वाटत नाही. एका ठिकाणी तंग वातावरण असताना आणि दुसर्‍या ठिकाणी माणसे दगडांचा वर्षाव करीत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रसंग पडला तर रिव्हॉलव्हरने परिस्थितीला तोंड देणारा मनुष्य घाबरला किंवा गोंधळला होता हे म्हणणे बरोबर होणार नाही. स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी अडीच तास जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

अर्थात् गोळीबारामध्ये एक मनुष्य मेल्यानंतर दुसर्‍या दिवशी लोकांच्या मनावर स्वाभाविक परिणाम झाला असेल व त्यामुळे वातावरण तंग झाले असेल. या बाबतीत सरकारने काय केले असे विचारण्यात येते. सरकारने रिलिफ देण्याची आवश्यकता नव्हती. कारण स्थानिक लोकांनी ते काम केले आहे. ज्यांना ह्या दंग्यामुळे त्रास झाला त्यांना मदत म्हणून कर्ज देण्यासाठी, चौकशी करण्यासाठी, स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी जाऊन राहिले आहेत. मी त्या ठिकाणच्या आमदार मंडळींना भेटलो आणि अधिक माहिती मिळावी म्हणून तेथील दोन स्थानिक अधिकार्‍यांना बोलावणे पाठवून त्यांच्याकडून ताजी माहिती घेतली आहे. त्या लोकांना मदत करण्यासाठी कर्ज देण्याची व्यवस्था झाली आहे. ही येवला येथे झालेल्या गोळीबाराची हकीकत आहे. या बाबतीत एक गोष्ट निश्चित आहे आणि सन्माननीय सभासदांनीही ती मान्य केलेली आहे. त्यांचे मत असे आहे की, जातीय दंग्याच्या बाबतीत सरकारने कडक धोरण स्वीकारले पाहिजे. यापेक्षा कडक धोरण घेण्याची माझी तयारी आहे. त्याचबरोबर एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती ही की, कडक धोरण स्वीकारल्यामुळे प्रव्होकेशन झाले, तंग वातावरण निर्माण झाले असे म्हणण्याचा कदाचित प्रयत्न होईल. तेव्हा तो प्रसंग टाळण्यासाठी प्रयत्न करीत असताना संयम ठेवून बोलावे लागते. येवल्याच्या प्रकरणाचा विचार करून जातीय दंग्याच्या बाबतीत सरकार जास्तीत जास्त कडक धोरण स्वीकारण्यास तयार आहे, हे मी सन्माननीय सभासदांना सांगू इच्छितो. अध्यक्ष महाराज, मला जो वेळ मिळाला होता त्यामध्ये आवश्यक ती माहिती मी सभागृहाला देण्याचा प्रयत्न केला आहे. यापेक्षा अधिक बोलणे इष्ट नाही असे मला वाटते.
------------------------------------------------------------------------------
On 1st October 1958, Shri Chavan, Chief Minister, defended Government’s action of police firing to quell the riot at Yeola. He said that the police were caught unawares. He admitted that the police made an error of judgement in tackling the situation, and that it was as a last resort the police opened fire. In conclusion, he said that the Government would take stern measures to check communal riots.