भाग १ विधानसभेतील भाषणे-४० eng

अशा रीतीने हिंदुस्थान सरकारच्या काही महत्त्वाच्या कचेर्‍या नागपूरला येणार असल्याने नागपूरचे महत्त्व कायम राहण्यास पुष्कळ मदत होणार आहे. भौगोलिक दृष्टया नागपूरला जे केंद्रीय स्थान प्राप्त झाले आहे त्यामुळे नागपूरला स्वाभाविकपणे आणि आपोआपच महत्त्व येण्याखेरीज गत्यंतर नाही. अर्थात् एखाद्या ठिकाणी राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणाला जे एक विशिष्ट वैभव किंवा दिमाख प्राप्त होतो तो नागपूरला लाभणार नाही ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे काही लोकांच्या मनात नाराजी निर्माण होणे शक्य आहे. पण त्या नाराजीला भिऊन चालणार नाही. अशा तर्‍हेने कोणाच्या नाराजीला भिऊन विधानसभेची अधिवेशने गावोगाव भरविण्याचे सरकारने ठरविले तर त्यामधून अनेक शहरांचे प्रश्न निर्माण होतील. उद्या औरंगाबादचे लोकही म्हणतील की औरंगाबादलाही विधानसभेचे अधिवेशन भरविण्यात यावे. त्यांना जर आम्ही म्हटले की पूर्वी राजधानी तुमच्या येथे नव्हती म्हणून तुमच्या येथे अधिवेशन भरविता येत नाही, तर मराठवाडयातील लोकांना राग येईल. कारण प्रत्येकाला आपापल्या भागाबद्दल अभिमान वाटत असतो. पण मी अशा तर्‍हेच्या भावनेला उत्तेजन देऊ इच्छित नाही. एखाद्या ठिकाणी केवळ विधानसभेचे अधिवेशन भरविल्याने त्या ठिकाणाला महत्त्व प्राप्त होते असे मी मानीत नाही आणि म्हणून नागपूरला विधानसभेचे अधिवेशन न देण्यामध्ये त्या शहराचे महत्त्व कमी करावे असा माझा मुळीच उद्देश नाही. वस्तुतः नागपूरला विधानसभेचे अधिवेशन भरविण्याने त्याच्या महत्त्वात काही विशेष भर पडणार आहे असे नाही. उलट, अशा तर्‍हेने भिन्न भिन्न ठिकाणी अधिवेशने भरविण्याने राज्यकारभारात मात्र अनिश्चितता, अव्यवस्था आणि अकार्यक्षमता निर्माण होण्याची भीती असल्यामुळे या ठरावाला सरकारला मान्यता देता येत नाही असे सांगणे माझे कर्तव्य आहे.

अध्यक्ष महाराज, या ठरावातील चर्चेच्या ओघात इतरही जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. फक्त सन्माननीय सभासद श्री.एस्.एम्.जोशी यांनी आपल्या भाषणात ज्या एका गोष्टीचा उल्लेख केला ती बाबत मात्र मी खुलासा करू इच्छितो. श्री.जोशी हे नागपूरला गेले असताना त्यांना तेथे काळे झेंडे दाखविण्यात आले आणि महात्मा गांधींच्या हत्येसंबंधात काही अनुचित घोषणाही करण्यात आल्या ही खेदाची गोष्ट आहे. याबाबतीत श्री.जोशी यांनी जे विचार व्यक्त केले त्यांच्याशी मी सहमत आहे. कारण आम्ही या पक्षाचे लोक असे मानीत नाही की, एखाद्या व्यक्तीने जर एखादी अनुचित गोष्ट केली तर तीबद्दल सबंध जमातीला, समाजाला किंवा प्रांताला जबाबदार धरण्यात यावे, पण काळे झेंडे ही गोष्टच अशी आहे की ते हातात आल्याबरोबर मनात पाप यावयाला लागते. काळे झेंडे दाखविण्यावर आम्ही कधी विश्वास ठेवला नाही किंवा काळया झेंडयांना आम्ही भितो असेही नाही. परंतु काळे झेंडे हातात आल्याबरोबर मनात काळे विचार येतात म्हणून काळे झेंडे दाखविण्यावर बंदी घातली पाहिजे. असो एखाद्या व्यक्तीच्या कृत्याबद्दल सबंध समाजाला, जमातीला किंवा प्रांताला जबाबदार धरणे योग्य होणार नाही असे जे श्री.जोशी यांनी सांगितले त्याबाबतीत त्यांच्याशी माझे एकमत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------
-On 26th February 1958, Chief Minister, Shri Chavan, rejected the resolution proposing Legislature Sessions, at Nagpur and Rajkot. He agreed that Nagpur people felt aggrieved because Nagpur did not have the old status of a Capital. Admitting that he was a party to the Nagpur pact, he said that at that time the concept of Nagpur as the second Capital did not arise; it was confined only to the point that Nagpur should have some connection with the administration. He further said that if we want to retain the importance of Nagpur, we must solve its economic and industrial problems and the Government was pledged to do so.