भाग १ विधानसभेतील भाषणे-११५

श्री. महादेव तुकाराम ठाकरे ह्यांचा जन्म १९१६ साली झाला. सन १९३६ पासून शेवटपर्यंत ते काम करीत राहिले होते आणि विशेषतः विदर्भ आणि वर्धा जिल्ह्यात त्यांनी काम केलेले आहे. वर्धा जिल्हा लोकल बोर्डाचे ते सन १९३८ ते ४० पर्यंत उपसभापती होते. सन १९५२ ते ५७ पर्यंत ते मध्य प्रदेश विधानसभेचे सभासद म्हणून काम करीत होते आणि त्यानंतर १९५७ पासून १९६१ पर्यंत ते मुंबई आणि महाराष्ट्र विधानसभेचे सभासद म्हणून राहिले. शेवटपर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणून राहिले. खरोखरच कार्यकर्ता कसा असावा हे जर आपणास पाहावयाचे असेल तर आपण श्री. ठाकरे यांच्या जीवनाकडे पाहिले पाहिजे. त्यांचे जीवन अत्यंत त्यागमय होते. त्यांच्या त्यागी जीवनाची कल्पना आम्हाला त्यांच्या मृत्यूनंतर आली हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीची जी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी स्वतःसाठी अथवा स्वतःच्या कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद करून न ठेवल्याचे दिसून आले आणि त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची आणि खाण्यापिण्याची काय सोय करावी असा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात स्वतःविषयी कधीच विचार केला नाही. समाजसेवक जर असावा तर असा असावा. त्यांचे जीवन अत्यंत त्यागमय होते. ते कोणत्याही वेळी भेटायला आले असताना आपल्या स्वतःबद्दल कधी बोलत नसत. त्यांनी आपल्या स्वतःच्या अडचणी कधीच दुसर्‍यासमोर मांडल्या नाहीत. शेवटपर्यंत काम करीत असतानाच त्यांना मुंबई येथे मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूमुळे सबंध राज्याचे आणि विशेषतः वर्धा जिल्ह्याचे नुकसान झालेले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व लोक सहभागी आहोत.

सर कावसजी जहांगीर ह्यांच्या निधनामुळेही आपले फार नुकसान झालेले आहे. त्यांचा जन्म मुंबई येथे सन १८७९ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण प्रथम मुंबईला आणि नंतर सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे झाले. ब्रिटिश राजवटीच्या काळातही ते एक फार थोर आणि प्रख्यात व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते.

त्यांनी आपले सार्वजनिक जीवन सन १९०४ पासून सुरू केले आणि प्रथम सन १९०४ मध्ये ते मुंबई कॉर्पोरेशनचे सभासद झाले. आणि तेव्हापासून त्यांच्या सार्वजनिक कार्यास खर्‍या अर्थाने सुरुवात झालेली आहे. मुंबई कॉर्पोरेशनच्या कार्यात त्यांनी जवळ जवळ १७ वर्षे सक्रिय भाग घेतला आणि त्याच बरोबर इतर अनेक कार्यांशी त्यांचा संबंध आला. सन १९१४-१५ साली ते कॉर्पोरेशनच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यानंतर सन १९१९-२० साली ते मुंबई कॉर्पोरेशनचे अध्यक्ष झाले. सन १९२१ आणि १९२३ साली ते मुंबई विधान परिषदेचे सभासद म्हणून निवडून आले एवढेच नव्हे तर सन १९२१ ते १९२३ पर्यंत ते त्यावेळच्या मुंबई राज्याच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर सभासद होते. त्यांनी सन १९३०-३१ व सन १९३३ साली लंडनमध्ये राउंड टेबल कॉन्फरन्सही अटेंड केली होती. सन १९३३ मध्ये लंडन मोनॅटरी आणि इकॉनॉमिक कॉन्फरन्ससाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांना लंडनला पाठविण्यात आले होते.

आर्थिक क्षेत्रातील त्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. मुंबईच्या अनेक व्यापारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आलेला आहे. मुंबईला शहरात एक कलाप्रेमी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. कलाक्षेत्रातील त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सन १९१४ मध्ये ते बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. सन १९५५ मध्ये रॉयल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटिश आर्टिस्ट्स ह्या संस्थेचे सभासदत्व लाभलेले ते पहिले भारतीय होत. कलेचे ते उपासक होते आणि कलेविषयी त्यांना विशेष आस्था होती. मुंबई शहरातील कलाविषयक गोष्टींशी त्यांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध येतच राहिला आहे.

माझा त्यांचा संबंध सन १९५५ नंतर विशेषकरून आला आणि सन १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र राज्याला सर्व पार्शी जमातीचा संपूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांनी एक समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभास मी हजर होतो आणि त्यांची तब्येत बरी नसतानाही ते संपूर्ण समारंभ संपेपर्यंत माझ्या शेजारी बसून होते. आणि हा समारंभ संपेपर्यंत मी हालणार नाही असे ते माझ्याजवळ बोलले होते. महाराष्ट्र राज्याबाबत पार्शी समाजाची निष्ठा आणि सद्‍भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी जो समारंभ आयोजित केला, त्यांची ती सद्‍भावना मी येथे व्यक्त केली पाहिजे. त्यांच्या निधनामुळे आपण मुंबईतील एका थोर कलोपासकाला आणि कर्तबगार व्यक्तीला मुकलो आहोत.

ह्या चारही व्यक्तींच्या निधनामुळे आपले नुकसान झालेले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ह्या आमच्या भावना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आपल्याला पोहचविल्या पाहिजेत.
---------------------------------------------------------------------------------
Shri Y.B.Chavan, Chief Minister, paying glowing tributes to Dr. P. Subbarayan, ex-Governor of Maharashtra, and other three ex-Members of the Assembly and Council, namely, Dr.S.B.Manjrekar, Shri M.T.Thakare and Sir Cowasji Jahangir suggested that the House should convey its sincere condolences to the bereaved families.