भाग १ विधानसभेतील भाषणे-११३

३१

श्री. लक्ष्मण गोविंद पाटील यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव* (११ जुलै १९६२)
-------------------------------------------------
कुलाबा जिल्ह्यातील एक ज्येष्ठ निष्ठावान समाज कार्यकर्ते व माजी विधानसभा सदस्य कै. श्री.ल.गो.पाटील यांस मा.श्री. चव्हाण यांनी श्रध्दांजली वाहिली.
------------------------------------------------------------------------
* Maharashtra Legislative Assembly Debates, Vol. VII, Part II (Inside No. 24), 11th July 1962, p. 1136.

अध्यक्ष महाराज, १९३७ साली या सन्माननीय सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून आलेले श्री. लक्ष्मण गोविंद पाटील यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. श्री. लक्ष्मण गोविंद पाटील यांचा जन्म १८८६ साली कुलाबा जिल्ह्याच्या वाघराम या गावी झाला. कुलाबा जिल्ह्याचे हे एक जुने कार्यकर्ते होते. ते मूळचे शेतकरी होते. नंतर ते वकील झाले. १९०७ साली त्यांनी राजकीय कार्यकर्ता या नात्याने कामास सुरुवात केली आणि त्या सालापासूनच त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले. कुलाबा जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांशी त्यांचा संबंध आला. कुलाबा जिल्ह्यातील पहिली राजकीय परिषद त्यांनी संघटित केली आणि मराठा आग्री विद्यार्थी आश्रम नावाची संस्था सुरू केली. मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने त्यांनी या संस्थेची स्थापना केली. शेतकी सुधारणेच्या बाबतीतही त्यांनी बरीच आत्मीयता दाखविली व शेतकी क्षेत्रात प्रगती केली. १९२१ साली त्यांनी शेतकरी व मीठ खात्याचे कामगार यांचा यशस्वी संप घडवून आणल्याचाही उल्लेख आहे. त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीतही भाग घेतलेला होता. १९३७ साली ते कुलाबा जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आले. ३ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी ते मरण पावले.

या सन्माननीय सभासदांशी व्यक्तिशः माझा परिचय नव्हता किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रसंगही मला आलेला नव्हता. परंतु ज्या अनेक जुन्या माणसांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा पाया घालण्याचे काम केले त्यापैकी हे एक होते. त्यांच्याविषयी कृतज्ञता नोंदविणे हे सभागृहाचे कर्तव्य आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव या सभागृहाने पास करावा आणि या सभागृहातील सभासदांच्या भावना त्यांच्या कुटुंबियांना कळवाव्यात अशी मी विनंती करतो.
---------------------------------------------------------------------
On 11th  July 1962, Shri Y.B.Chavan, Chief Minister, requested the House to express its sincere condolences for the death of Shri L.G.Patil who belonged to a bygone generation which considered dedication to duty as sacred as scriptures.