व्याख्यानमाला-१९९५-९६-३४

आम्ही लोकशाहीचा सिद्धांत स्वीकारला. सार्वभौम सत्ता लोकांची हे तत्व मानापासून स्वीकारले पण लोकशाहीचा सिद्धांत व्यवहारांत आणताना मूळ तत्वाशी तडजोड करून, युरोपियन पद्धतीची प्रातिनिधीक लोकशाही स्वीकारली. मोठी लोकसंख्या, मोठे देश असल्यामुळे लोक प्रत्यक्ष शाही चालवू शकत नाहीत, म्हणून पर्याय काढला. लोकांनी आपले प्रतिनिधी निवडावेत. त्या प्रतिनिधींनी राज्यकारभार करावा आणि लोकांनी त्यातच समाधान मानावे अशी मूळ तत्वाशी तडजोड करून युरोपियन पद्धतीची प्रातिनिधीक लोकशाही स्वीकारली. मोठी लोकसंख्या, मोठे देश असल्यामुळे लोक प्रत्यक्ष शाही चालू शकत नाहीत, म्हणून पर्याय काढला. लोकांनी आपले प्रतिनिधी निवडावेत. त्या प्रतिनिधींनी राज्यकारभार करावा आणि लोकांनी त्यातच समाधान मानावे अशी मूळ तत्वाशी तडजोड केली. लोकशाही ऐवजी लोकप्रतिनिधीशाही असा पर्याय आपण स्वीकारला. आणि या पर्यायी लोकशाही व्यवस्थेत राजकीय पक्षांना मोठे महत्व आले. लोकशाही, राजकीय पक्ष व देशाची जडणघडण यांचे हे नाते चव्हाण साहेबांनी सांभाळले. पक्ष मोडून राजकारण करणा-या इंदिरा गांधींशी मतभेदही केले. १९६९ नंतर शिस्तबद्ध पक्षाचे राजकारण मागे पडले. पैशाचे राजकारण सुरू केले गेले.

राजकीय पक्षांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. आपल्याच ध्येयवादावर लोकमत जागृत व संघटित करून देशाच्या जडणघडणीच्या कामात राज्यसत्तेबरोबर लोकशक्तीचा सहभाग हवा तेवढा मिळवला नाही. भारतीय राज्यघटनेची शपथ घेता पण त्या घटनेतील उद्दीष्टांची त्यांना आठवण रहात नाही. स्वतःच्या पक्षाच्या ध्येयवादाशीही ते प्रमाणिक रहात नाही. ध्येयवादाचे सामाजिक, आर्थिक, परिवर्तनाचे देशाच्या ज़डणघडणीचे राजकारण ते करीत नाहीत. तर संकुचित स्वार्थासाठी पदे, पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी सत्ताबाजीचे राजकारण करतात. त्यासाठी पक्ष बदल करून ‘आयाराम गयाराम’ चे संधासाधू राजकारण करतात. या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या पुढा-यांनी राजकारणाचे व्यापारीकरण केले. गुन्हेगारीकरण केले. काहीजण तर अतिरेकीकरण करायलाही मागेपुढे पहात नाहीत. सा-या राजकीय पक्षांनी आपल् चिंध्या करून घेतल्या आहेत. तत्वहीन, संधीसाधू राजकारण करून भारतीय लोकशाही अराजकाच्या भोव-यात येऊन सापडली आहे, असे आज आपल्या अनुभूतीस येत आहे.

महात्मा गांधींच्या सेवाग्राम येथील “बापूकुटी” च्या दारावर, सात पापे कोणती ते लिहीले आहे. त्या सात पापामध्ये तत्वहीन राजकारण हे प्रथम क्रमांकाचे महापाप असे लिहीले आहे. हे महापाप स्वतंत्र भारतातील सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी केले आहे. त्या त्यांच्या पापांची फळे भोगायची पाली भारतीय जनगणाला आली आहे. राजकीय पक्षाच्य तत्वहीन सत्ताबाजीच्या राजकारणांमूळे नवभारताच्या उभारणीमध्ये प्रचंड अडथळे आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. परिवर्तनाचे, उभारणीचे, नवभारत निर्मितीचे मुख्य साधन म्हणून आपण राज्यसत्तेकडे पहातो, तिथेच राजीकय पक्षांनी ही अनागोंदी चालविल्यामुळे ऐन लढाईच्यावेळी दारुगोळा पाण्यात टाकल्यासारखे झाले आहे. सारेच पक्ष “इझम” बोलतात, कुणी “कॅपिटॅलिझम” कुणी “कम्युनिझम” कुणी “सोशॅलिझम” तर कुणी “डेमोक्रॅटिक सोशॅलिझम” च्या नावाने पक्ष काढतात. काहीजण तर “हिंदुइझम”, शिखीझम, “मुस्लीम फंडामेंटॅलिझम” असेही बोलतात. लोकांची दिशाभूल करतात. पहिली २०-२५ वर्षे या दिशाभूलीत गेली असात सारेच इझम विरले आहेत. सर्वांनी आता एकच इझम व्यवहारांत आणला आहे तो म्हणजे “ऑपॉर्च्युनिझम” संधीसाधूपणा. देशातील आजच्या अराजकसदृश्य परिस्थितीचे मुख्य कारण हा राजकीय पक्षांचा सत्ताबाजीसाठी चाललेला संधीसाधूपणा आहे. त्यामुळे बांधणीचे, जडणघडणीचे मुख्य काम बाजूला पडले आहे. सर्व बाज्यामध्ये ही सत्ताबाजी भयंकर. तिला महापाप म्हटलंच आहे, बाकीच्या बाज्या व्यक्ती किंवा कुटुंब उध्वस्त करतील पण ही सताताबाजी सारा देश उध्वस्त करते. सारा समाज बेबंदशारीत ढकलून देते. सत्तेसाठी काहीही करणेस हे पक्ष तयार आहेत. संस्कृतमध्ये “सत्तातुराणाम् न भयं न लज्जा”. देश चालवण्यासंबंधीचा आपला विचार, ध्येयवाद, कार्यक्रम निश्चितपणे लोकांपुढे ठेवावा. लोकशिक्षण करावे, जागरण करावे, लोकमत घडवावे, बनवावे आणि ते आपल्या पक्षाच्या पाठीशी संघटित करावे. प्रातिनिधीक लोकशाहीत राजकीय पक्षाचे हे मुख्य काम, परंतु असे लोकशिक्षण, प्रबोधन करून लोक आपल्या पाठीशी घेण्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षा लोकांची खुषमस्करी करण्याच्या क्लृप्त्या प्रत्येक पक्ष करीत असतात. कोणी धर्म वापरतो, कुणी जातीजमाती वापरतात, कुणी पैसा वापरतो, विचार जागृत करण्यापेक्षा विकार, दुराभिमान जागवण्यात प्रत्येकजण आघाडी घ्यायला पहातो आहे.

म. गांधींनी राजकारणाचे आध्यात्मीकरण केले ते काही जणांना प्रतिगामी वाटते. सत्यशोधक, सत्याग्रही राजकारण, पुरोगामीतत्वाच्या नावाखाली सत्ताशोधक, संपत्तीशोधक अवस्थेत खाली घसरले. म. गांधींचे नांव घेऊन राजकारण करणारांनीही व्यवहाराच्या नांवाखील राजकारणाचे व्यापारीकरण, बाजारीकरण केले.