व्याख्यानमाला-१९९५-९६-२३

हा रोग आता शिक्षण व्यवस्थेच्या काळजापर्यंत भिडलेला आहे. शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया हा शिक्षण व्यवस्थेचा प्राण आहे तो प्राणच आता कंठाशी आला आहे. ही अत्यावस्थ शिक्षण व्यवस्था मरू द्यायची नाही, जिवंतपणा बधीर अवस्थेत टिकवून धरायचे अशी व्यवस्था करण्यांत संस्था चालक, शिक्षक आणि प्रशासक यशस्वी झाले आहेत.

ही भयंकर स्थिती बदलणे पुरेसा निर्धार असेल तर, शक्य आहे. सा-या सेवा क्षेत्रांत, “पे अंण्ड प्रोटेक्शन इन सर्व्हीस, शाल गो वुईथ परफॉर्मन्स इन सर्व्हिस” आणि “परफॉर्मन्स् शाल बी इव्हयॅल्युटेड बाय द बेनिफिसरीज ऑफ द सर्व्हिस” एवढे एक तत्व खंबीरपणे लागू केले. तर सा-या सेवा क्षेत्राचे हे प्रचंड बांडगुळी स्वरूप झडून जाईल.

प्रचलित शिक्षण व्यवस्थेचा खर्च आणि लाभ यांचे प्रचंड व्यस्त गणित, तर सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह धरणा-या सा-या समजसुधारकांच्या आत्म्याला शांती ऐवजी स्वर्गात अशांती मिळवून देणारी आहे. तो खरेच पालकांच्या खिशाबाहेर पूर्वीपासूनच गेला आहे. पण आता सरकारी तिजोरीच्या आवाक्याबाहेर ही गेला आहे. एकूण शिक्षण खर्चापैकी ५ टक्के खर्च केवळ पगारावरील खर्च आहे. प्राथमिक शिक्षणाच्या स्तारावर पगाराचा खर्च ९५ टक्के होतो. शिक्षण क्षेत्र आता एक अग्रेसर पगार हमी क्षेत्र झाले आहे. अशिक्षीतांना जशी रोजगार हमी, तशी शिक्षितांना पगार हमी, म्हणूनच मुख्यतः शिक्षण क्षेत्र चालू ठेवले आहे.

या व्यवस्थेचे फलीत काय? इ. १२वी पर्यत ९६.३ टक्के गळती आणि पासी जेवढ्यांना या शिक्षण लाभ होतो त्यांना या देशातील चांगले नागरिक म्हणता यईल का? भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रीय जीवनमूल्यांना त्यांनी बांधून घेतले आहे का? चारित्र्य आणि चरितार्थ मिळवण्याची पात्रता त्यांनी कमावली क? देशाचा ते एक “अँसेट” म्हणून उभे राहिलेत की देशावरची “लाएबिलिटी” बनून राहिलेत? मायावादी, परलोकवादी भ्रमिष्ट धारणेतून त्यांची मने बाहेर आली का? जातीभेद, जन्माधिष्ठीत उच्चनीचता या अमानुष कुसंस्कारातून ते मुक्त झालेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे निराशजनकच आहेत.

सा-या जागातील निरक्षरापैकी ५५ टक्के निरक्षर लोक आपल्याच देशांत आहेत. साक्षरांचीही राक्षसी वत्ती कमी झालेली असते, असं नाही. तो “सोशल” आणि “रॅशनल” होतो याचीही प्रचिती नाही. या साःया इंग्रजी शिक्षण पद्धतीचे, स्वतंत्र भारताच्या उभारणीवर काय भयंकर परिणाम झाले आहेत आणि आमचे सारे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण कसे आत्मविनाशाच्या गर्तेकडे चालले आहे याचा काही संदर्भ, मी उद्याच्या भाषणासाठी राखून ठेवीत आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण प्रसाराची चळवळ ही मुख्यतः ब्राह्मण धर्मातील भ्रमिष्ट, परलोकवाद, कर्मवाद, जन्मधिष्ठीत उच्चनीचता, भेदाभेद, विषमता, शोषण आणि उच्चवर्णियांचे वर्चस्व, यांतून मानवी मन मुक्त व्हावे, म्हणून समाजसुधारकांनी सुरू केली. विजेच्या पाश्चात्या संस्कृतीचे सामर्थ्य समजून यावे, मनामनांत समता, एकता, बंधुभाव वाढून सारा विस्कलीत समाज संघटित व्हावा. माणुसकीचे हक्क व कर्तव्ये याची त्याला जाणीव व्हावी. न्याय, अन्याय, सत्य, असत्य, चांगले, वाईट हे त्याला समजावे आणि न्याय, सत्य, चांगले असेल त्याची बाजू घेऊन त्यांने आयुष्य जगावें अशाही अपेक्षा शिक्षणप्रसाराच्या चळवळी पासून होत्या. म. जोतिबा फुल्यांनी वर्णन केलेली अविद्या नष्ट व्हावी आणि विद्येच्या प्रसाराबरोबर स्त्री शूद्रादि सर्व मानवांस सन्मती, नीती, प्रगती, संपत्ती साधता येऊन सफल आयुष्य जगता यावे अशीच कल्पना होती.

शिक्षण प्रसाराचा हेतू साध्य करण्याची व्यवस्था उभी केली पण ती फार तुटकी फुटकी गळकी निघाली. जे आणि जसे शिकवले जाते तो शिक्षणाचा आशय लोणी काढून घेतलेल्या आंबट शिळ्या ताकासारखा झाला. मनःस्थिती परिवर्तनासाठी शिक्षणप्रसार मांडला, पण हे परिवर्तन विकृतीकडेच वळले.