अभिनंदन ग्रंथ - लोकमान्यांनंतर -2

या पत्रानंतर केशवरावजी ठाक-यांचें मला पत्र आलें कीं, यशवंतरावजींनी पांचशे रुपये (व्यक्तिश:) देण्याचे आश्वासन दिलें आहे.

प्रतापगडावरील शिवस्मारक उद्घाटन समारंभांत पक्षीय दृष्टि बाजूस सारून भाग घ्यावा हें आवाहन आम्ही अमान्य केलें; पण यशवंतरावजींनी दादर शिवस्मारकाबाबत स्वत:ची पक्षीय दृष्टि बाजूस सारून सक्रिय पाठिंबा दिला.

अद्याप दादर शिवाजीपार्कच्या पुतळ्यासाठी समितीकडून प्रयत्न होत नही. पण संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतरावजींचे एकनिष्ठ अनुयायी व सच्चे मित्र श्री. बाळासाहेब देसाई यांचे प्रयत्नाने यशवंतरावजींनी गेटवे ऑफ इंडिया या प्रमुख स्थानीं भव्य अशा शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याची गेल्या २६ जानेवारी १९६१ रोजीं स्थापना करुन खरी शिवभक्ति महाराष्ट्राच्या प्रत्ययास आणून दिली- बाकी सारे घोषणाच करीत आहेत आणि इतर कार्यासाठी हजारों रुपये फंड जमा करीत आहेत.

इतरांच्या मतांबद्दल व पक्षनिष्ठेबद्दल आदर

यशवंतरावजींची ओळख असली, आम्ही एकमेकाला व एकमेकांच्या कार्याला जाणत असलों तरी माझे व यशवंतरावजींचे तसे जवळचे संबंध आले नव्हते. मी विरुद्ध पक्षांत असलों आणि जाहीर टीका करीत असलों तरी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, राजकारणपटुत्वाबद्दल आणि अष्टपैलू ज्ञानाबद्दल मला अंतर्यामीं आदरच होता. बहुजनसमाजांत असा कर्तृत्ववान पुरुष निघाल्याबद्दल अभिमानच वाटत होता. माझे साहित्यिक मित्रहि त्यांच्यावर खूप होते आणि विरोधी पक्षांतहि त्यांच चाहते असल्याचें मला आढळलें.- पण १६-३-१९६० नंतर त्यांचे माझे संबंध अधिक जवळचे झाले. औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते कोल्हापुरास आले होते - पण कोणत्याहि जाहीर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी येण्याच्या जाहीर झालेल्या वेळाचे अगोदर ते मजकडे आले. माझे घरीं जेवले, पाय टाकतांच माझ्या घरीं लावलेले प्रसिद्ध व्यक्तींचे पोट्रेटेंस ते पाहत होते. त्यावेळी मी म्हणालो, "यशवंतरावाजी, तुमचा पोट्रेंट मीं लावला नाही. कारण तुमच्याबद्दल तो भाव माझ्या मनांत या वेळेंपर्यंत नव्हता - तुमच्यापेक्षा मला बाळासाहेब देसाईच जवळचे वाटतात." यावर ते रागावले तर नाहीतच; पण त्यांनी बाळासाहेबांना माधवराव असें म्हणत होते म्हणून खिलाडूपणाने सांगितलें.

मी भेटीवेळीं त्यांना नावडतें असें पुष्कळ बोललों. कांही वागणुकीबद्दल नापसंती व्यक्त केली. त्यावेळीं यशवंतरावजींनी अगदी मोकळ्या मनाने खुलासा केला. कांही आडपडदा राखला नाही. या खुलाशामुळे यशवंतराव मनमोकळें कोणाशीं बोलत नाहीत, कोणाला विश्वासांत घेऊन बोलत नाहीत, असा जो आरोप अनेक जण त्यांच्यावर करतात तो गैरसमजानेच करीत असावेत असें मला वाटूं लागलें ! नाही तरी मुख्य मंत्र्याचें जागेवर असलेल्या व्यक्तीला भेटणा-या सर्वांशी आपलें अंत:करण कसें उघडें करतां येईल? स्पष्टवक्तेपणाच्या नांवाखाली मनांत येईल ते विचार फटकळपणाने बोलणें व इतरांना दुखवणें यांतच कांहीना मोठेपणा वाटतो. यामुळे आपण अनेक शत्रू निर्माण करतों याची त्यांना जाणीव नसते. स्वत: माझ्यांत हा दुर्गुण आहे; व त्याने निष्कारण शत्रू निर्माण केले आहेत. मुख्य मंत्र्यांचे जागेवर असणा-याला संयम हा पाळलाच पाहिजे. यशवंतरावजी तो पाळतात आणि कोणाला दुखवीत नाहीत, हा गुण घेण्याजोगा आहे.

तास दीड तास ते माझ्या घरी होते; पण मी काँग्रेसमध्ये यावें असें त्यांनी कोणत्याहि प्रकारें सूचित केलें नाही. कांही विरोधी पक्षांतले त्यांच्यावर जो आरोप करतात कीं, दुस-या पक्षांतल्यांना फोडण्याचा ते प्रयत्न करतात तो साफ खोटा आहे, हें मी अनुभवाने सांगूं शकतों - ते स्वत: कट्टर पक्षनिष्ठ असल्यामुळे इतरांच्या पक्षनिष्ठेबद्दल त्यांना आदरच वाटतो.

जातांना यशवंतरावजी म्हणाले, "माधवराव, तुम्हांला जेव्हा लिहावेंसें वाटेल त्यावेळीं लिहीत चला. कांहिहि लिहित चला. त्याचा मला राग येणार नाही." त्यावर मी म्हणालो, "मी लिहीन. पण माझे चुकेल तेथे तुम्हीहि लिहीत चला. म्हणजे माझा फायदा होईल." त्यावर "तो माझा अधिकार नव्हे" असे म्हणून त्यांनी आपली सुटका करून घेतली. यांत सौजन्य तर आहेच, पण शहाणपणाहि तितकाच आहे. मी वाटेल तसें लिहूं शकतों तसें मुख्य मंत्र्यांना कसें लिहितां येईल- बोलणें निराळे आणि लिहिणं निराळं.