महाराष्ट्रातील दुष्काळ - ७१

९.  ठिबक सिंचन पद्धती काळाचे आव्हान

श्री. व्ही. बी. पाटील
शेती अर्थशास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स,
जळगांव
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करून पाण्याचे वापर शास्त्रशुद्ध करून भरवशाने अधिक शेती उत्पादन निर्माण करता येते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गेली सतत तीन वर्षे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत वावरत आहे.  या दुष्काळाची तीव्रता विविध भागात कमी अधिक आहे.  देशातील पाण्याचा प्रश्न ही राष्ट्रीय समस्या आहे आणि पाणी हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक बनला आहे.  वारंवार दुष्काळ, पाण्याची टंचाई ह्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत आहे.  ग्रामीण जीवन अस्थिर बनले आहे.  म्हणूनच पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन व त्याचा योग्य वापर ह्या बाबींवर फार लक्ष दिले जावे.

आज महाराष्ट्रात जवळजवळ २४ लाख हेक्टर इतकी सिंचनक्षमता पाटबंधारे प्रकल्पातून निर्माण झाली आहे.  (निव्वळ पिकाखालील क्षेत्राच्या फक्त १३ टक्के).  याशिवाय विहिरींच्या माध्यमातून जवळपास १५ लाख हेक्टरक्षेत्र भिजू शकते.  महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०८ लाख हेक्टर आहे.  ह्यापैकी पिकांखालील एकूण क्षेत्र २०८ लाख हेक्टर असून, निव्वळ पिकाखालील क्षेत्र १८४ लाख हेक्टर एवढे आहे.  महाराष्ट्रात १० लाख विहिरींच्याद्वारे भूगर्भातील पाण्याचा वापर करून शेतीसाठी पाणी दिले जात आहे.  महाराष्ट्रात दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतीतून हेक्टरी उत्पादनक्षमता.  उत्पादनक्षमता वाढविल्याशिवाय महाराष्ट्राची शेती आर्थिक दृष्ट्या परवडणारी ठरणार नाही.  शेतीच्या हेक्टरी उत्पादन क्षमतेमध्ये 'पाणी' हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे.  महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट, पाण्याची कमतरता, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे किंवा पातळी खोल जाणे, उपसा सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे ह्यावर प्रभावी उपाय म्हणजे पाण्याचे नियोजन व त्यानुसार महाराष्ट्रात जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा अवलंब करणे.

पाण्याचे नियोजन :

शेती उत्पादनासाठी पाणी सोडून लागणारे इतर घटक थोड्याफार प्रमाणात कमी अधिक झाल्यास त्यांचा पिकांच्या एकरी उत्पादनावर उल्लेखनीय असा फरक होत नाही.  परंतु पाणी हा मुलभूत घटक आहे.  त्याच्या अभावी शेतीतील उत्पादन फारच घटते.  पीक, पाणी व जमीन ह्यांचा शास्त्रीय घनिष्ट संबंध आहे.

पाणी नियोजनाचा साधा सुटसुटीत अर्थ म्हणजे, पीक, हवामान, जमीन यांचा अभ्यास करून केव्हा, किती व कोठे व कसेकसे पाणी द्यावयाचे याची शास्त्रशुद्ध मांडणी करून पाणी पुरवठा करणे.

नवीन सिंचन पद्धतीमध्ये म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचे नियोजन शक्य आहे.  पाण्याचे ठिबक सिंचनाद्वारे शास्त्रशुद्ध नियोजन झाल्यास पिकांचे सिंचनाखालील क्षेत्र तर वाढणारच परंतु हेक्टरी उत्पादन क्षमता पण वाढणार.  अतिपाण्यामुळे जमिनीवर अनिष्ट परिणाम टाळता येतात.