व्याख्यानमाला-१९८९-३१

जोतिराव फुल्यांचं हे विवेचन वाचताना आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं ते माझे मित्र डॉ. रावसाहेब कसबे यांनी जे 'धर्म आणि इतिहास लेखन' या विषयावर याच व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडलेले होते. त्या संदर्भात हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की भारताचा सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास हा नेहमी उच्च वर्णीयांच्या अंगानी लिहिलेला आहे. आणि धर्म हा मूठभर लोकांचे पोटाचे साधन म्हणून वापरला आहे. हाजो संबंध इतिहास दिला गेला तो अतिशय एकारलेल्या पद्धतीने लिहिला गेला आणि म्हणून भारतीय इतिहासार्च पुनर्लेखन करायचं असेल तर सामान्य माणसाच्या झोपडीच्या पायथ्याशी थांबून हा इतिहास लिहावा लागेल.
भारतीय समाजाचा सांस्कृतिक वारसा घडविण्यामध्ये या समाजातील ९७% टक्के बहुसंख्य रयत ज्याला आम्ही राष्ट्र म्हणतो, त्या देशातील कलावंत होते,  प्रतिभावंत होते. बारा जोतिलिंगाची मंदिरे नटविणारे आमच्या सर्वसामान्य शिल्पकारांचे हात हे जनतेतून आलेले कलाकार हात होते. यांचा संदर्भ बाजूला ठेवून केवळ धार्मिक मक्तेदारीच्या नावाखाली शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांना पिळवटून टाकलं होतं. आणि या ९७% रयतेचा प्रतिनिधी म्हणून जोतिराव फुले एका क्रांतिसिंहासारखे महाराष्ट्राच्या आभाळाखाली त्या काळात गर्जत होत. स्त्रियांच्या दु:खाला वाचा देत होते. निरक्षर माणसाच्या व्यथा आणि यातनांना त्यांनी साक्षर केलं. हजारो वर्षे ज्यांचे ओठ बंद होते, ज्यांना फक्त जीभच होती, पण ज्ञानाचा उच्चार ज्या जिभेला स्पर्श करीत नव्हता अशा बंद ओठांना त्यांनी सूर्यासारखं उफाळायला लावलं.

जोतिराव फुल्यांचे मूल्यमापन करताना त्यांनी इथल्या शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, सामान्य माणसावर ज्या चातुर्वर्ण्य संस्कृतीचं जे आक्रमण झालं, त्या आक्रमणाला निपटून काढण्यासाठी, उपटून काढण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी 'शेतक-यांच्या आसूड' मध्ये एक वाक्य अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. "मूर्ति पूजेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे," पुढे गाडगे महाराज काय म्हणत - 'वेड लागलं जगाला ! देव म्हणती दगडाला ।।' संदर्भ बघा, चळीवळीचा कसा असतो ते मूर्तिपूजेपेक्षा ज्ञान श्रेष्ठे आहे. ब्रह्मापेक्षा जीवन श्रेष्ठ आहे. आणि जीवन हे सुंदरपणे जर उभं करायचं असेल तर ज्ञान हे जीवनामधलं सामर्थ्य आहे. याचा एक सत्यशोध, सत्यज्ञान जोतिराव फुल्यांना झालं.

"सार्वजनिक सत्यधर्माबद्दल" मी आपल्यासमोर बोल असतांना जेव्हा ती यादी वाचतो की सार्वजनिक सत्यधर्माची मूल्ये काय? जोतिराव फुले सांगतात- त्यांच्या भाषेत, ते सांगतात "माणूस येथून तेथून समान आहे. एक आहे." माणूस एक आहे मग धर्म अनेक कशासाठी! विश्वकुटुंब वादाचा एक मोठा प्रश्न मानवतेच हे आंतरराष्ट्रीयत्व. पृथ्वीवरचा माणूस एक आहे, त्याची सुख-दु:खं सारखी आहेत. त्याचा घाम, रक्त, त्याच्या यातना, व्यथा सारख्या आहेत. म्हणून तो सारखा आहे. अनेक धर्मांची गरज नाही. दुसरं एक सुंदर वाक्य-एक विचार फेकतात ते आपल्यासमोर-

ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणांशी । उराशी धरावे बंधुपरी ।।

धर्मांची सगळी वस्त्र जाळून फेकून देऊन धर्माच्या वस्त्रामधला सगळा वाटला गेलेला समाज, सगळी माणसं एक आहेत. असा एक निर्मिकाचा एकेश्वरवाद जोतिराव फुल्यांनी प्रस्थापित केला. दुसरं तत्त्व काय सांगीतलं, स्त्री-पुरुष समानता. स्त्री-पुरुष समानता हा अतिशय सुंदर विचार जोतिराव फुल्यांनी मांडला. आनंदाच्या आग्रहाखातर महात्मा गौतम बुद्धाने आपल्या धम्म भिक्कू संघामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला होता. प्रारंभी बुद्ध हा स्त्रियांना आपल्या बौद्ध भिक्कू संघामध्ये घेऊ नये या मताचा होता. पण आनंद आग्रह धरून बसला की, तुम्ही जर म्हणता की धर्म हे सततचं परिवर्तन आहे, तर मग एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या स्त्रियांना मानवीपणा नाकारता कसा? आणि बुद्ध तयार झाला.

माझे मित्र प्रा. आ. ह. साळुंखे इथं बसलेले आहेत. चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. चार्वाकांनीसुद्धा स्त्री स्वातंत्र्याचा अतिशय सुंदर अर्थ सांगितला आहे. त्यानंतर जोतिराव फुले हे एकच असे विचारवंत व तत्त्ववेत्ते होऊन गेले. की त्यांना मानवी जीवनातलं सौंदर्य सांपडलं. की हा मानवी समुदाय सुंदर बनवायचा असेल, मानवी जीवनामध्ये सौंदर्याचा आनंद प्रस्थापित करायचा असेल आणि या सौंदर्यात दडलेलं मानवी सामर्थ्य प्रत्ययाला आणायचे असेल तर स्त्री आणि पुरुष समानता पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत आर्यभट्टांनी स्त्रियांना शूद्र केलं. या बाबतीत कुठल्याही स्त्रीला राग येणार नाही इतके चवताळून ते उठतात. हा आपल्या आईचा अपमान ते मानतात. जी आमची जन्मदायी आहे, जी आम्हाला जीवन देते, मानवी जीवनाचा आम्हाला आकार देते, आशय देते, भाषेच्या रुपाने आम्हाला शब्द देते, नव्हे आम्हाला संस्कृती आणि समाज देते, त्या स्त्रीला तुम्ही शूद्र मानता ?