व्याख्यानमाला-१९८९-२९

१५. १८७८ साली मुठा नदीवरील धरण झाल्यावर पाटाचे पाणी घेण्यास शेतकरी तयार होईनात कारण त्यामुळे जमीन निरुपयोगी होती असा त्यांचा गैरसमज झालेला होता. त्यावर जोतिराव फुले यांनी मांजरी येथे दोनशे एकर जमीन घेऊन पाटाच्या पाण्यावर बागाईती करुन कोबी, फुलकोबी,संत्री, मोसंबी, बटाटे ही नवी पिके घेतलीच पण ऊसाचे मोठे पीक घेऊन गूळ तयार केला. पाटाच्या पाण्यावर ऊस भरपूर येतो हा त्यांचा शोध म्हणजे जणू महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे पहिले पाऊल होते.

१६. ही शेती करतानाच 'शेतक-याचा आसूड' हे पुस्तक लिहून आणि 'दीनबंधू' हे वर्तमानपत्र काडून शेतक-यांच्या प्रश्नांना चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

१७. शेतक-यांच्या जमिनी सावकाराने हडप करु नयेत या साठी त्यांनी मोठी चळवळ घडवून आणली ते साल १८७५ हे होतं.

१८. १८७९ साली मुंबईतील गिरणी कामगारांचा पहिला संघ स्थापन झाला. या कामात नारायण मेघाजी लोखंडे या आपल्या मित्राला जोतिरावांनी खास मदत केली.

१९. शेतक-यांच्या व्यथा ब्रिट्रीश उच्च अधिका-यापर्यंत पोहोचविल्या. शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, त्यांच्या मुलांना परदेशी कृषि प्रशिक्षणासाठी पाठवावे असा त्यांनी आग्रह धरला. १८८३ साली ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समोर शिक्षणाच्या संदर्भात आणि भारतीय समाजातील शोषणाच्या संदर्भात परखडपणे आग्रही मागणी मांडली.

मित्रहो, ही यादी आपल्या माहितीस्तव ढोबळ मानाने आपल्यासमोर मी मांडली आहे. ही सर्व लांबच लांब यादी जर पाहिली तर वाटते, भारतीय समाजातल्या प्रत्येक प्रश्नावर जोतिराव फुले यांनी किती खोलवर विचार केलेला होता. 'शेतक-यांचा आसूड' हे जर पुस्तक वाचलं तर मी नेहमी शेतक-यांच्या, दलितांच्या मुलांना सांगतो की महाविद्यालयात तुम्ही आलात, हजारो वर्षांनंतर  ज्ञानाची सुवर्णसंधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि आपण कशासाठी शिकत आहोत याचं उत्तर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मुलामुलींनी जोतिराव फुल्यांचं वाड्मय वाचलं पाहिजे कारण 'ब्राह्मण सर्वत्र पुज्यते' हा जो सिद्धांत होता. त्याला तुम्ही हरताळ फासा, हा जोतिरावांचा सर्वसामान्य माणसांना संदेश होता.

अज्ञानाच्या , निरक्षरांच्या अंध:कारातून हा सर्वसामान्य माणूस त्यांच्या जीवनातून त्याला उठवायचा असेल तर त्यांनी स्वत:चा आत्मशोध घेतला पाहिजे. स्वत:मधील सामर्थ्यांचा सत्यशोध त्याला आला पाहिजे. आणि ज्ञान हे त्याच्यावरील एक अमोघ अस्त्र आहे अशी एक खंबीर स्वरुपाची धारणा त्यांना मिळालेली होती. पेनचा 'ह्यूमन लिबर्टी' हा ग्रथ वाचून त्यांना प्रेरणा मिळाल्या होत्या. स्कॉटलंडच्या मिशनरींचे काम पाहून सुद्धा त्यांना प्रेरणा मिळालेल्या होत्या. आणि मुंबईला जगन्नाथशेठनी जी पहिली शाळा चालविली होती एक विशिष्ट स्वरुपाची, त्या शाळेचाही संदर्भ त्यांनी डोक्यात ठेवलेला होता. आणि त्यांच्यामध्ये एक 'ऱिबेलियन माईंड' ज्याला आपण बंडखोर मन म्हणतो की प्रस्थापित, अन्यायकारक, शोषक, आणि बहुसंख्य म्हणजे ९७% समाजाला वेदना,यातना, व्यथा देणा-या समाज व्यवस्थेला मुळातून बदललं पाहिजे याचा आग्रह धरून होतं.