व्याख्यानमाला-१९८०-२३

मित्रहो, टिळकांच्या मृत्यूनंतर देशातील राजकारणाची धुरा गांधीजींच्या हातात गेली हे आपल्याला माहित आहेच. महाराष्ट्रानेही गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले. गांधीजींच्या नेतृत्वाने स्वातंत्र्य लढ्याला एक व्यापक असा आशय प्राप्त करून दिला. त्याला एक वेगळेच तेज प्राप्त झाले. गोखल्यांना गुरुस्थानी मानणा-या गांधीजींचे नेतृत्व जहालवादी नव्हते. एका अर्थाने ते मूलग्रामी मात्र अवश्य होते. त्यांच्य नेतृत्वाची प्रवृती सात्विक होती आणी प्रकृती अध्यात्मिक होती. गांधीजींनी राजकाणाचा विचार समाजकारणाच्या संदर्भात केला हे विशेष महत्वाचे आहे. आणि म्हणून त्यांना समाजकारण व राजकारण एकत्रित आणता आले. राजकारणाला तसेच समाजकारणाला नैतिक मूल्यांचे आधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. आणि म्हणूनच भारताचे स्वातंत्र्य आंदोलन एक प्रगल्भ असा मानवतावादी आशय घेवू जगाच्या समोर उभे राहिले. समाज जीवनाच्य सर्व अंगोपांगांना स्पर्शून ते पुढे गेले. गांधीजींचे नेतृत्व हे ख-या अर्थाने एका महान प्रेषिताचे नेतृत्व होते. आणि म्हणूनच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची चळवळ ही केवळ राजकीय स्वातंत्र्याची चळवळ न राहता ती सांस्कृतिक विमोचनाची व उन्नयनाची सर्वकष चळवळ बनली. गांधीजींनी कितीतरी प्रश्नांना हात घातला! राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा त्यांनी लोकांच्या दारात नेवून उभा केला. स्वातंत्र्य आंदोलनाला सुधारणावादाच पाया देण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व वेचले स्वातंत्र्याच्या प्रेरणांबरोबर त्यांनी जनमानसात सामाजिक जाणीवाही निर्माण केल्या. राजकीय स्वातंत्र्य आधी का सामाजिक स्वातंत्र्य आधी? या प्रश्नाचा काथ्याकूट त्यांनी केला नाही. समाजजीवनाच्या सर्वांगांना स्वावलंबी व विकसित करणारे स्वातंत्र्य हे अशा वेगवेगळ्या कप्प्यात कोंडता येत नाही आणि विभागताही येत नाही. वस्तुतः स्वातंत्र्याचा विचार हा जीवनाच्या पूर्णांकाचा विचार असतो. तो अपूर्णांक विचार असू शकत नाही. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याला साधनरूप मानले; त्यांच्या कार्याचे अंतीम उद्दिष्ट व साध्या व्यक्ती व समाजाचे स्वावलंबन व सर्वांगीण विकास हेच होते. आणि शेवटी असा विकास कोणासाठी असतो? समाजातला जो शेवटचा माणूस आहे त्याच्यासाठीच तो असतो, नव्हे असला पाहिजे. “सर्वोदय” बनाम “अंत्योदय” हेच गांधीजींच्या जीवितकार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यांनी मांडलेली सर्वोदयाची संकल्पना ही स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाला आपल्या पोटात सामावून घेते हे वेगळे सांण्याची कांहीच आवश्यकता नाही.

महात्मा गांधींच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव सबंध देशातील राजकारणाव समाजकारणावर आणि अर्थकारणाव पडणे अगदी अपरिहार्य होते. तो प्रभाव त्या काळातील कोणत्याही पर्यायी विचारसरणीला किंवा वादाला कमी करता आला नाही. अनाकलनीय शक्तीच्या रूपाने गांधीजी भारतीय जनतेसमोर उभे राहिले. ही शक्ती भारताला राजकीय, सामाजिक आमि आर्थिकदृष्ट्या परावलंबी व गुलाम बनविणा-या दृश्य आणि अदृश्य पाशवी शक्तींच्या विरोधात उभी राहिली. भारतीय जनतेचे नीतीधैर्य आणि आथ्मविश्वास त्यामुळे वाढला. दलित व पीडित लोकांकडे वळल्याशिवाय या ठिकाणच्या समाजाची पुनर्रचना करता येणार नाही याची त्यांना कल्पना होती. भारतातील असंख्य खेड्यांकडे गांधीजी वळले ते याचसाठी; अस्पृश्यतेचा कलंक धुण्याचा संकल्प सोडून दलितोद्धाराचे कार्य त्यांनी हाती घेतले ते याचसाठी; आणि शतकानुशतके अतिशूद्रापेक्षांही अधिक उपेक्षित वागणूक मिळालेल्या भारतीय स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली तेही याचसाठी. स्वावलंबन म्हणजे स्वातंत्र्य आणि ते मिळविण्याच्या विविध वाटा दाखवित असते शिक्षण! आणि म्हणूनच महात्मा गांधींनी शैक्षणिक प्रश्नांचा गांभिर्याने विचार केला, शिक्षणाची संधी स्त्रियांनाही मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. महाराष्ट्रात यापूर्वी महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पाय घातला होता. सावित्रीबाई फुल्यांनी त्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीही या दिशेन कार्य आरंभिले होते. महर्षी कर्वांनी तर स्त्रीशिक्षणाच्या कार्याला आपले जीवित कार्य मानले होते. पंडिता रमाबाईलाही आपण या संदर्भात विसरू शकणार नाही. पण गांधीजींनी भारतीय स्त्रीला प्रत्यक्षतः स्वातंत्र्य लढ्यातच उबे केले. एका नवीन शक्तीचा आविष्कार स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी घडवून आणला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय स्त्री स्वातंत्र्य संग्रामात आत्मविश्वासाने, त्याग सेवेच्या भावनेने उभी राहिली. गांधीजींच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील राजकारणावर, समाजकारणावर आणि अर्थकारणावर सखोल परिणामकता निर्माण केली.