अभिनंदन ग्रंथ -स्वातंत्र्य साधनांत भारत महाराष्ट्र संबंध - 6

समता व स्वातंत्र्य

'केवळ निवडणुका' 'केवळ जबाबदार सरकार' एवढ्याने लोकशाही अर्थपूर्ण होत नाही. स्वातंत्र्य हें न्यायभावांतून निर्माण झालेलें द्रव्य आहे. समाजांत न्याय राहावा व तो सर्वांना मिळावा यासाठी स्वातंत्र्य व तें स्वातंत्र्य, जर तेथे समता नसेल, तर अर्थपूर्ण नाही. तें अपुरें आहे. समता केवळ राजकीय असून भागत नाही. सामाजिक समता व आर्थिक समता ही जर नसेल तर राजकीय समता ही थट्टेचा विषय आहे. जनता दु:खी आहे, दरिद्री आहे, आर्थिक दृष्ट्या असाहाय्य आहे, अशा स्थितींत निवडणुकीचा हक्क तिचें समाधान करूं शकत नाही. म्हणून लोकशाहीमध्ये सर्व समाजांत आर्थिक समता स्थापन झाली पाहिजे व समाजांत निर्माण होणारी संपत्ति सर्व समाजाची व तिचे वितरण सर्वोच्यासाठी समानतेला धरून असलें पाहिजे. क्षणाक्षणाला आपली उन्नति होत आहे, ही भावना ख-या लोकशाहींत जनतेमध्ये सतत प्रादुर्भूत असली पाहिजे. या दृष्टीने विचार करतां भारतामध्ये जें आर्थिक तत्त्वज्ञान स्वीकारले गेलें आहे, तें लोकशाहीच्या दृष्टीने अनुरूप आहे. क्रान्तिवाद स्वीकारलेला नसला तरी क्रमवाद काम करीत आहे. सर्वच कांही एकदम होईल असें नाही; पण प्रवास चालू आहे. गति कुंठित झालेली नाही. म्हणून भारतांत लोकशाहीला धोता आहे, असें मानण्याचें कारण नाही. लोकशाहीच्या यशस्वितेसाठी मतदार ज्याप्रमाणे सुशिक्षित असावा लागतो त्याप्रमाणे नेतृत्वहि विशाल दृष्टीचें असावें लागतें. आपलें हित म्हणजे जनतेचे हित न मानतां सार्वजनिक हितांत आपला पक्ष, आपण, आपलें गाव या सर्वाचा समावेश होतो, असें मानणारे, नव्हे श्रद्धा असणारे, ते असले पाहिजेत. मोठा म्हणजे महान नव्हे, स्थानावर आला म्हणून श्रेष्ठ नव्हे. असे मानण्याची विवेचक वृत्ति समाजांत असली पाहिजे. समाजामध्ये कांही मूल्ये सतत प्रभावी असलीं पाहिजेत. तरच लोकशाही यशस्वी होईल. तत्त्वहीन राजकारण असतां कामा विवेक नये. सदसद्विवेकबुद्धिशून्य संपन्नता नाशाचे कारण ठरते. म्हणून समाजामध्ये उच्च विचारांची, समाजाची नित्य काळजी वाहणारी माणसें असावी लागतात. त्यांतूनच व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवें नेतृत्व उदयाला येते. आज या दृष्टीने विचार करतां देशांतील सार्वजनिक शील थोडें शिथिल झालें आहे, राजकारण हें व्रत न राहातां वृत्ति झाली आहे. सार्वजनिक जीवन सेवा न राहातां एक व्यवसाय बनला आहे, असें आढळतें. ही घसरण जर थांबविली गेली नाही तर लोकशाहीला निश्चित धोका आहे. संतोषाची गोष्ट आहे की, देशांतील विचारवंतांनाहि जाणीव झाली आहे; महाराष्ट्रांतहि होऊं लागली आहे. म्हणून अनेक लोक आज जरी भारतांतील लोकशाहीच्या भविष्याबद्दल सचित असले तरी तितकें चिंता करण्याचे कारण नाही. मात्र जनता सावधान असली पाहिजे. कारण, लोकशाही स्वातंत्र्याची किंमत अखंड सावधानता हीच आहे.

"जनतेच्या जीवनांतले प्रश्न हातीं घेऊन कांही निश्चित कार्यक्रमाची आखणी करून राजकीय पक्षांनी पुढें आलें पाहिजे. असा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम शासनसंस्थेमार्फत पार पाडण्याइतकी शक्ति ही राजकीय पक्षांची कसोटी आहे."
- श्री. चव्हाण ( सांगलीचे भाषण)