कृष्णाकांठ१७८

गाडीत निवांत बसल्यानंतर माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. भूतकाळातील सुख-दु:खांची धूसर क्षणचित्रे डोळ्यांपुढे येऊ लागली. त्याचप्रमाणे अनोळखी पण रंगतदार भविष्याची बोटेही आपल्याला पालवताहेत, असे वाटले. माझ्या मनात येऊन गेले, की माझ्या जीवनात मोठा बदल झाला आहे. कृष्णाकाठी वाढलो. हिंडलो, फिरलो, झगडलो, अनेक नवी कामे केली, मैत्री केली, माणसे जोडली, मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता. आता मी कृष्णकाठ सोडून नव्या क्षितिजाकडे चाललो आहे. आता ती क्षितिजे रंगीबेरंगी दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात तेथे पाहोचेपर्यंत ती तशीच राहतील का? कोण जाणे!
मी अशा विचारांच्या तंद्रीत असतानाच आमच्या जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे एक पुढारी रावसाहेब मधाळे हे मजजवळ आले आणि म्हणाले,

''कुठे चाललात?''

मी त्यांना सांगितले,

''अर्थातच मुंबईला. नवे काम अंगावर घ्यायला.''

त्यांनी आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले,

''तुम्ही फार चांगल्या दिवशी हे नवे काम अंगावर घेत आहात.''

मी म्हटले,

''मी काही पंचांग पाहून निघालो नाही; पण आज असा कोणता महत्त्वाचा दिवस आहे?''

ते म्हणाले,

''आज १४ एप्रिल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्म-दिवस आहे.''
मी म्हटले,

''फारच चांगला योगायोग आहे !''

माझ्या ध्यानी-मनी सुद्धा नसताना हा दिवस निवडला गेला, ही माझ्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे, असे मी मानतो.     

- आणि आमची डेक्कन क्वीन खंडाळ्याच्या घाटातून एकापाठोपाठ एक बोगदे मागे टाकत वेगाने पुढे चालली होती.

कधी अंधार, तर कधी प्रकाश असा खेळ खेळत आमचा प्रवास चालला होता.

पुढच्या जीवनाचे हे प्रतीक तर नव्हते?