महाराष्ट्रातील दुष्काळ - 191

६. डॉ. सुब्रमण्यम समिती १९८६
आवर्षण प्रवण पुनर्विलोकन समिती (शिफारशींचा गोषवारा)

१.  या प्रदेशातील जलसिंचनाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता या भागात पाणी पुरवठा करू शकतील अशा सर्व मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे योजना सन २००० पर्यंत निश्चितपणे पूर्ण करण्यात याव्या व त्यासाठी योजनेमध्ये जरुर ती आर्थिक तरतूद केली जावी.  आंतरराज्य नद्यांच्या पाणी वाटप लवादाच्या निर्णयासंदर्भातही हे आवश्यक आहे.

२.  आठमाही पाणीपुरवठा सोय लक्षात घ्यावी.

३.  दुसरा महत्वाचा मुद्दा जी वर्षे आयोगानेही मांडला होता, तो म्हणजे या प्रदेशात उपलब्ध होणारे पाणी जास्तीत जास्त क्षेत्राला मिळावे व येथील पाण्याचे एकूण वाटप सामाजिक न्यायाला धरून असावे.  पाटाचे पाणी बारमाही पद्धतीने देण्याऐवजी आठमाही पद्धतीने दिले, कालव्यांची लांबी वाढविली व आवश्यक तेथे उपसा सिंचनाचा अवलंब केल, तर हे उद्दिष्ट साध्य होईल.

४.  अवर्षण प्रवण क्षेत्रात जलसिंचनासाठी राबयावयाच्या एकूण उद्दीष्ट असे असावे की, प्रत्येक अवर्षण प्रवण तालुक्यातील निव्वळ लागवडीखालील किमान ५० टक्के जमिनीला निदान एका पिकासाठी पुरेसे पाणी मिळावे अशी व्यवस्था पुढील दहा वर्षात व्हावी.  त्याचबरोबर या सिंचनव्यवस्थांचा फायदा तालुक्यातील जास्तीत जास्त कुटूंबाना मिळावा असे उद्दिष्ट असावे.  शक्य तो पाच माणसांच्या एका कुटुंबाला खरीप हंगामात एक हेक्टर शेतीसाठी किमान आवश्यक पाणी मिळाले पाहिजे.  त्यासाठी पिकांना खरीप हंगामात २० इंच पाणी उपलब्ध व्हावयास हवे.  मोठ्या व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांच्या कालव्यांची लांबी वाढविणे उपसा सिंचन, लघुसिंचन व तुषार, ठिंबक सिंचन पद्धती या सर्व उपायांचा अवलंब करून वर नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यात यावीत.  स्थानिक पातळीवरील लघुसिंचन प्रकल्पाचाही एक भरीव कार्यक्रम हाती घेणे जरूर आहे.  या योजनांसाठी अग्रक्रमाने आर्थिक तरतूद करण्यात यावी.  त्याचबरोबर अवर्षणप्रवण क्षेत्रात लघुसिंचन प्रकल्पासाठी योग्य अशा इतर सर्व उपलब्ध जागाही शोधून व त्याचे सवेक्षण करून प्रकल्पांचे नकाशे व खर्चाचे अंदाजे (प्लॅन व एस्टिमेट्स) तयार करावेत.  या क्षेत्रातील सर्व उपलब्ध पाणी अडविण्यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम पुढील १० वर्षामध्ये पुरा करण्याच्या दृष्टीने योजनामध्ये आर्थिक तरतूद करावी.  या कार्यक्रमामध्ये मुख्यत्त्वे लघुसिंचन तलावा, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व पाझर तलाव यांचा समावेश असावा.

५.  फक्त पावसाळ्यात वाहणारे काही नाले साधारणतः प्रत्येक गावात असतात.  अवर्षण प्रवण प्रदेशात पाऊस अनिश्चित असल्यामुळे ज्या ज्या वेळी तो पडतो त्या वेळी नाल्यात येणारे पाणी साठवून ठेवल्यास ते अत्यंत उपयुक्त ठरते.  म्हणून आमची अशी शिफारस आहे की, योग्य जागी चिरेबंदी बंधारे किंवा मातीचे साठा तलाव, नालापंध, गावतलाव, शेततळी, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व भूमिगत बंधारे बांधून त्यात हे पाणी साठवावे किंबहुना अशा बांधकामाचा एक योजनाबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा.

६.  अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्व उपलब्ध पाणी अडवून ते साठविण्याचे महत्त्व लक्षात घेता आमची अशी शिफारस आहे की, इतर क्षेत्राच्या तुलनेने या लघुसिंचन तलाव प पाझर तलाव यांच्या खर्चाची मर्यादा दीडपट असावी.  अशाप्रकारे खर्चाची मर्यादा वाढवून देखील या तलावांची पुरेशी कामे एखाद्या अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये उपलब्ध होऊ शकत नसल्यास तेथे खर्चाची कोणतीही मर्यादा न ठेवता तांत्रिक दृष्ट्या शक्य असेल त्या ठिकाणी असे तलाव बांधावेत.