महाराष्ट्रातील दुष्काळ - १४९

२९.  उत्पादन क्षमतेसाठी तंत्र-विज्ञेचा आश्रय घेऊन नव्या पद्धतीनेही पाणी वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे.  शिवाय हा कार्यक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यासाठी सर्व सामान्य शेतकर्‍याला परवडेल असे मार्ग शोधले पाहिजेत.

३०.  शेती व लोकसंख्येचा प्रचंड बोजा वाढल्यामुळे आणि शेतीचे लहान तुकडे झाल्यामुळे, लक्षावधी शेतकर्‍यांना शेती परवडेनाशी झाली आहे.

३१.  शेतावर प्रचंड बोजा वाढल्यामुळे शेतकर्‍याचा विकास ज्या वेगाने व्हावयास पाहिजे, तो न झाल्यामुळे, दुर्देवाने ग्रामीण भागात दलित व दलितेतर संघर्ष तीव्र होऊ लागले आहेत.

३२.  सध्या देशात पाच हेक्टरपेक्षा लहान शेतीच अधिक आहे.  ह्या शेतीवरील बराचसा जनसमूह शेतीवर गुंतवावा लागणार आहे, ह्याचा विचार करणारे नियोजन केले पाहिजे.

३३.  उद्योगधंद्यांचा विस्तार कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवर १२-१३ टक्क्यापेक्षा कमी राहाणार नाही असा प्रयत्‍न करावा लागेल.

३४.  गेल्या २५ वर्षामध्ये शेतीची सरासरी फक्त ३ टक्के आहे.  ह्या वास्तव पार्श्वभूमीवर हे केवढे प्रचंड आणि अवघड काम  आहे की त्याची कल्पना ह्या शिबिरात सामील झालेल्या सुबुद्ध आणि समाज चालवणार्‍या मंडळींना असायला हवी.  आपणा सर्वांना ह्या विषयीची कल्पना असावी म्हणून मी याचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे, कारण या शिवाय तरणोपाय नाही.

३५.  सर्व क्षेत्रात लक्ष घालण्यासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करणे ही एक सर्वात मोठी महत्त्वाची गरज आहे.  शेती व उद्योग धंद्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून आणि प्रशिक्षित मनुष्यबळ ह्यांच्या आधारे हे शक्य होणार आहे हे झाल्यानंतरच तरुणांमधील असंतोष, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न आणि इतर सामाजिक समस्या सोडविण्यास मदत मिळेल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने योजलेल्या ह्या विचार विनिमय शिबिरातील निष्कर्ष म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध होणारे हे निवेदन जनतेपुढे विचारांसाठी आम्ही नम्रपणे ठेवतो आहोत.  ह्या निवेदनमध्ये काही मूलभूत सुधारणा व्हावी असे ज्यांना वाटते त्यांनी त्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते लेखी स्पष्टिकरण करून ते संलग्न करायला हरकत नाही.  किरकोळ स्वरूपाच्या सुधारणाबाबत सध्या आग्रह धरू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.