महाराष्ट्रातील दुष्काळ - १२३

खार्‍यापाण्यातली शेती

आज सबंध महाराष्ट्राला भेडसावणारा असा एक प्रश्न आहे.  तो प्रश्न म्हणजे कोकणाच्या सागर किनारीची शेती.  आजपर्यंत आमच्या वाडवडिलांची जी काही शेती आहे ती आमच्या तिकडच्या कोकणातल्या माणसांची केवळ भात शेती !  खाजण शेती !  आणि मळे शेतीही त्यात होती, त्या ठिकाणी नारळी-पोफळीच्या ज्या बागा आहेत, त्या गोड्या पाण्याशिवाय जगलेल्या आहेत.  खार्‍या पाण्यांवरच त्या बागा जगलेल्या आहेत हे आम्ही पाहिलेले आहे !  आज तेथील ते मळे आणि हजारो एकरांची जमीन ही का म्हणून वाया जात आहे ?  नष्ट का होते आहे ?  कोणाच्यामुळे नष्ट होत आहे ?  जर त्याचा विचार शासनकर्ते करणार नसतील तर त्याला जबाबदार कोण आहे ?  की फक्त जनता की तो कामगार, की तो शेतकरी आहे ?  मला वाटते की ह्याला जबाबदार जर कोणी असेल तर ते निव्वळ शासनकर्तेच आहेत !  दुसरे कोणीही नाही !  म्हणून शासनकर्त्यांनीच ह्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे.

तात्पुरती मालकी बदला

मी विधानसदनाचा सदस्य असताना एक ठराव आणण्याचा प्रयत्‍न केला होता.  ठराव असा होता की ज्याला गरज आहे, ज्याला भूक आहे, तो जर स्वतःची भूक भागवून दुसर्‍याची जमीन, कसण्याकरिता तयार असेल तर त्या वेळेपुरता मालक बदलला पाहिजे.  उदाहरणार्थ फक्त पावसाळ्यात शेतीचा वापर करणारा शेतकरी, उन्हाळ्यामध्ये पाणी असतानाही जमिनीचा पुरेपूर वापर करत नसेल आणि इतर कोणाला ती जमीन वापरायलाही देत नसेल तर जमीन वापरायचा हक्क त्याने उन्हाळ्यात तरी दुसर्‍याला द्यायला हरकत नसावी.  जो गरजवंत असेल तो ती जमीन उन्हाळ्यांमध्ये वापरून त्यातून पीक काढणार असेल तर त्याला ती द्यावी.  तेथील असलेल्या पाण्याचा वापरही करू दिला पाहिजे.  माझे विचार ऐकून माझ्या एका मित्राने मला धोक्याचा इशारा दिला की 'तुझ्या ह्या सूचनेचा परिणाम असा होईल की तुझ्याविरुद्ध लोकांचा मोर्चा निघेल.  तुला कोकणात पाऊलही ठेवायला मिळणार नाही.'  मी मित्राला म्हणालो, 'भले हरकत नाही, मी त्यांच्याशीही ह्या प्रश्नाबद्दल चर्चा करीन.'   मी येथे जमलेल्या सर्व जाणत्यांना विचारतो की तुम्ही ह्या प्रश्नांबाबत काय करणार आहात ?  शासनकर्त्यांनी ह्याचा विचार करून योग्य तो परवाना दिला पाहिजे.

खारे मळे सरकारने ताब्यात घ्यावे

बागायती शेती विषयीची चर्चा झाली.  पाणी जिरवा हे आपण म्हणतो आहोत.  ती बागायती शेती जर कोकण प्रांतामध्ये होऊ शकणारी असेल, तर त्या सागर किनार्‍यांवर नारळ-पोफळीच्या बागा आज विपुल होण्यासारख्या आहेत.  परंतु आज संबंध खारे मळे ओस पडलेले आहेत.  ते आज शासनाने ताब्यात घेतले पाहिजेत.  अथवा शासनाने आदेश काढून ज्याला गरज आहे त्याला ते करायला दिले पाहिजेत.  ह्या कोकणात कितीतरी चांगले शेतकरी बिनकामी बसून आहेत.  मघाच्या माझ्या मित्राचाही उल्लेख त्यात करू शकेन !  माझ्या मित्राने जर मला म्हटले असते, 'इतरांचे सोडा, राजाभाऊ तुमची जी कोकणातली जमीन आहे, ती तुम्ही मला १०-१५ वर्षे कराराने द्या.  तर ती १५ वर्षांच्या कराराने आम्ही ती करायला तयार आहोत.'  हे कोणी तरी केले पाहिजे.  ते करून द्यायला त्याला जमीन बदलीचा व पिकाचा हक्क प्राप्‍त करून दिला पाहिजे.  सध्या कायद्यात तशी सोय नाही.

ह्या खार्‍या पाण्याचा उपयोग मुंबई शहरांतल्या बकाल वस्तीमधील संडास साफ करण्यासाठी लागणारे पाणी म्हणून करता येईल की नाही ?  अस्वच्छ मैला घालवण्याकरता ह्या पाण्याच्या वापर मुंबई शहरांमध्ये करू शकतो की नाही ?  अवश्य करू शकू !  त्याच्या करता यंत्रणा निर्माण केली तर हे होण्यासारखे आहे.  ७५ टक्के वापराच्या पाण्यात ५० ते ६० टक्के पाणी हे धुण्यासाठी लागते.

पाण्याच्या वापराबाबतही परंपरा सोडून विज्ञानानिष्ठित विचार करायला पाहिजे.  वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पाणी वापरले तर चांगले शुद्ध पाणी वाचू शकते.  मग खारे पाणी हे संडास आणि मलनिस्सारणासाठी होऊ शकेल.  मला एका मित्राने सांगितले की परदेशात हे गटाराचे पाणी व संडासाचे पाणी परत स्वच्छ करून कपडे धुवायला देतात.  हे जर मी मुंबईत सांगायला गेलो तर माझे महाराष्ट्रीय बांधव तर उद्या मला मारायला धावून येतील.  इथे ह्या चर्चेच्या ठिकाणी खरोखरीची विद्वान माणसे आलेली आहेत.  त्यांनी शासनाला जर एखादी चांगली गोष्ट, पटवून दिली तर ती केली जाईल.  विद्वानांनी, शास्त्रज्ञांनी व तज्ज्ञांनी ह्या गोष्टींच्या अंमलबजावणीचा प्रयत्‍न करायला पाहिजे असे मला वाटते.

ज्या शेतीला व झाडांना जास्त पाणी लागत नाही, अशाप्रकारची जी झाडे आहेत ती बागायत तुम्ही करण्याची चळवळ हाती घेतली पाहिजे.  त्या झाडांपासून उत्पन्न मिळेल, अशा झाडांपासून मिळणारे काही फायदे आहेत.  त्यापैकी काही झाडांपासून पाणी मुरले व जिरणे होऊ शकेल.  पण हे करण्यासाठी वृत्ती पाहिजे.  हे करून देणार्‍या शासनाचे हात इतक्या तर्‍हेने समर्थ केले पाहिजेत.  तरच हे होऊ शकते.

मा. यशवंतरावजींच्या या प्रतिष्ठानच्यावतीने हे विचार मांडण्याकरता मला जी संधी दिली त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या मंडळाला व प्रमुखांना धन्यवाद देतो.