व्याख्यानमाला-१९७९-४४

व्याख्यान तिसरे - दिनांक - १२ मार्च १९७९

विषय - "भारतीय राज्यघटना आणि सामाजिक परिवर्तन !"

व्याख्याते - डॉ. सत्यरंजन साठे, प्राचार्य, लॉ कॉलेज, पुणे.

व्याख्याता परिचय -

आपल्या देशाची राज्यघटना उधारउसनवारीवर आधारलेली नसून तिच्यामागे इतिहास आहे. राजकीय स्वातत्र्याच्या चळवळीबरोबरच भारतात सामाजिक परिवर्तनही घडत होते. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा आधार होत. आपली राज्यघटनाही भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा यांतूनच आकाराला आलेली आहे. ती मूलभूत तत्त्वे कायम ठेवून मग घटनेत कितीही दुरुस्त्या झाल्या तरी बिचकण्याचे कारण नाही.

भारताचे तांत्रिक औद्योगिक प्रगती साधली असली तरी त्याला अभिप्रेत सामाजिक, आर्थिक क्रांती झाली नाही. राजकारणात संधिसाधुपणा, पक्षांतर, जातिभेद यांचे वर्चस्व वाढले. लोकशाही मूल्यांविषयी निष्ठा कमी झाली. भ्रष्टाचार वाढला, आर्थिक विषमता वाढली. अंध:श्रद्धा फोफावल्या, दैववाद बळावला. आचारात आधुनिकता आली पण विचार मागासलेलेच राहिले कायद्यांचे नियोजन नसल्याने ते कागदावरच राहिले.

न्यायालये, संसद, वृत्तपत्रे या संस्था प्रभावीपणे कार्यान्वित व्हावयाच्या असतील तर त्यांच्यावर लोकमताचा अंकुश हवा. याकरिता लोकशाहीचा खरा आधार म्हणजे सामान्य नागरिक त्याला राज्यघटनेतील मूल्यांबाबत जिव्हाळा वाटला पाहिजे. त्याला जागृत करण्यासाठी लोकशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.

नांव : डॉ. सत्यरंजन साठे, प्राचार्य.
 
शिक्षण : बी. ए. एल्. एल्. बी व एल्. एल्. एम्. ( पुणे विद्यापीठ )

१९६४ मध्ये रेमंड इंटरनॅशनल फेलोशिप मिळाली व अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात शिकागो येथे अध्ययन. कायद्यातील सर्वोच्च पदवी एस्. जे. डी. - डॉक्टर इन् ज्युरिडिकल सायन्स - संपादन केली. ( तौलनिक घटनात्मक कायद्यांवरील प्रबंध ) देशी व परदेशी कायदेविषयक व इतर नियतकालिकांमधून जवळ जवळ तीस संशोधन लेख प्रसिद्ध. दोन ग्रंथही प्रसिद्ध. त्यापैकी एकाची 'Administrative Law' तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

बनारस हिंदू विश्वविद्यालयात एक वर्ष अध्यापन, इंडियन लॉ इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे, २ वर्षे संशोधन अधिकारी म्हणून अनुभव.

१९६० मध्ये मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर विभागात व्याख्याता म्हणून नेमणूक. १९६६ मध्ये त्याच विद्यापीठात प्रपाठक (Reader) ह्या जागेवर नेमणूक. १९७६ मध्ये इंडियन लॉ सोसायटीच्या पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमणूक. गेल्या १८ वर्षात ८ पीएच् डी. प्रबंधांचे यशस्वीरित्या मार्गदर्शन.

मराठीतून 'समाज प्रबोधन पत्रिका,' महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, केसरी यांतून लेखन. सध्या वाई येथील मराठी विश्वकोशात मंडळात कायदेशास्त्रातले एक अभ्यागत संपादक व इंडियन इन्सिट्यूट ऑफ एज्युकेशनमधील मानद प्राध्यापक ( Honorary Professor).