व्याख्यानमाला-१९७५-७

जयप्रकाश नारायणांची चळवळ ही कशावर उभी राहिली आहे? जयप्रकाश नारायण हे ‘सबंध क्रांतीची’ जी भाषा बोलताहेत त्या ‘सबंध क्रांतीवर’ लोकांचे प्रेम आहे का? ‘सबंध क्रांती’ लोकांना कळली आहे का? जयप्रकाशांचा ‘सबंध क्रांती’ हा गांधीवाद आहे. ही ‘सबंध क्रांती’ हा सर्वोदय वाद आहे आणि देशातील लोकांना गांधीवाद आणि सर्वोदयवाद पूर्वी कधी मानवला नाही. आणि जयप्रकाशांच्या ‘सबंध क्रांती’ च्या स्वरूपातही लोक तो मानणार नाहीत. यशवंतराव जयप्रकाशांचं बळ त्यांच्या फक्त एकाच मागणीवर आदारित आहे. त्यांची मागणी एवढीच की या सरकारमधील भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे. जयप्रकाशांनी हा निषेध नोंदवलेला आहे. आणि तो निषेध फक्त लोकांना पसंत आहे. माझा मुद्दा हा की लोकांच्या लक्षात आले आहे की इथे मवाळपणा आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचा विकासाचा कार्यक्रम जर फलदायी ठरला नाही तर आपल्याला आश्चर्य वाटायचे कारण नाही.

दुसरा एक दोष असा दिसतोय की वाढत्या किंमती. मी मघाशीच तुम्हाला म्हणालो मी इथं १०।१२ वर्षांपूर्वी व्याख्यान दिले की किंमती वाढताहेत, आणि त्या आवरल्या पाहिजेत. पुढच्या १०।१२ वर्षांमध्ये किंमती आणखी कितीतरी वाढल्या. १९६० सालच्या मानाने या आजच्य किंमती या सव्वातीन पट आहेत. माणासाचे उत्पन्न सव्वातीन पटीने वाढले नाही हे उघड आहे. लोकांनी विकासाची किंमत म्हणून महागाई स्विकारायची. महागाईमधून काही त्याग करायचा. एवढा त्याग लोकांना पेलत नाही. लोक त्याग करतात पण त्या त्यागाची सुद्धा काही एक मर्यादा असते. दोन वर्षापूर्वी मी ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये एक तडाखेबंद लेख लिहला होता. तो असा की मुंबईतल्या नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी बोनस मागू नये. बोनस मागणे हे गैर आहे. आणि आता माझ्या लक्षात येते की माझे म्हणणे लोक ऐकणार नाहीत. आज रिझर्व्ह बँकेचे लोक पगारवाढ मागतात, भत्तेवाढ मागतात. स्टेट बँकेचे लोक पगारवाढ मागतात, भत्तेवाढ मागतता. प्राध्यापक लोक पगारवाढ मागतात, भत्तेवाढ मागतात. का मागतात? त्यांना ते माझ्याइतकेच माहीत आहे. परंतु जो त्याग करायला हवा त्या त्यागाला त्यांच्या दृष्टीने काही मर्यादा आहेत, प्रत्येकांने ही मर्यादा आखून घेतलेली आहे. या मर्यादेच्या पलिकडे त्याग लोकांना जमत नाही आणि महागाईने हा त्याग लादला जातो आहे. गेल्या वर्षी मला अमुक अमुक वेतन मिळाले. यावर्षी मला ५० रुपयांची वाढ मिळाली. पण माझा खर्च जर २००रु. वाढला असेल तर माझ्या ५०रु. वाढ याला काही अर्थ रहात नाही. परिणाम असा होतो की सगळेच लोक नाराज होऊन नियोजनाची शिस्त, उत्तम शेती करायला लागणारी मनाची शिस्त, उद्योग धंदा उत्तम चालायला लागणारी मनाची शिस्त आणि स्वास्थ्य हे कुठे राहतच नाही.

इतकेच नव्हे तर ही अशी महागाई वाढत गेली तर महागाईमधून मंदी येते. आता ही मंदीची चाहूल गेल्या काही महिन्यामध्ये लागलेली आहे. आणि जर ती मंदी येईल आणि वाढत जाईल तर हजारो लोक बेकार होतील आणि मग इथं हाहा:कार होईल. किंमतवाढीतून मंदी येते ती अशी: मी माझे उदाहरण देतो, गेल्या वर्षी मी दुधाच्या तीन बाटल्या सरकारच्या दूध केंद्रावरून विकत आणायचो. आता किंमती वाढल्या. मी दोनच बाटल्या आणतो. गेल्या वर्षीपर्यंत मी दरवर्षी तीन सदरे शिवून आणीत असे. या वर्षापासून मी दोनच सदरे शिवून आणू लागलो. आपण सगळी माणसे या पद्धतीने किंमती वाढल्यानंतर गरजा कमी कमी करून लागलो. याप्रमाणे सबंध समाजाची मागणी कमी होते आणि जर मागणी कमी झाली तर उत्पादन कमी होणारच. हे साधे गणित आहे. किंमती वाढत्या राहिल्यामुळे काही काळ उत्पादन वाढत रहाते. पण विशिष्ट मर्यादेनंतर वाढत्या किंमतीमुळे वाढते उत्पादन होत नाही. वाढत्या किमंतीमुळे मागणी खाली येते आणि मागणी खाली आल्यामुळे उत्पादन खाली येते ही आजच्या मंदीची मीमांसा आहे. जर वाढत्या किंमतीला आधीच आवर घातला असता तर आजची मंदी दिसती ना.