महाराष्ट्रातील दुष्काळ - ८८

चिलीमधील फळ व्यापार

पीचेस, नेक्टराइनस् पिअर्स, प्लम्ज, हनीडिव, मेलनस इत्यादी फळे या दिवसांत चिलीतून अमेरिकेत आयात होत असतात.  द्राक्ष व औषध खात्याच्या हुकमाप्रमाणे वरील फळांशिवाय rasp-berries, blue-berries, black-berries, seedless water melons, cantaloupes, juan canary-melons, graining smith apples, cacus pears आणि ruince या चिलीतील फळांनाही बंदीहुकूम लागू केलेला आहे.  

फळबागांचा विकास आणि फळांची निर्यात यांच्या आधारे चिलीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.  सर्व जगभर चिलीची अशा प्रकारची प्रशंसा होत असतानाच वरील घटना घडली आहे.  चिलीच्या निर्यातीत प्रामुख्याने द्राक्ष आणि सफरचंद यांचाच समावेश आहे.

अमेरिकेला होणार्‍या फळांच्या निर्यातीमुळेच चिलीच्या अर्थव्यवस्थेवर हे अरिष्ट कोसळले आहे.  त्यावर लवकरच इलाज शोधला जाईल, असे चिलीच्या सरकारने जाहीर केले असून, देशाच्या कोणत्या भागात हे घडले आणि ह्यास कोण जबाबदार आहे याचा शोध आम्ही केला आहे, असा चिलीच्या सरकारचा दावा आहे.

जर या संकटातून मार्ग निघाला नाही तर अनेक मोठमोठ्या मळ्यांचे आणि कंपन्यांचे दिवाळे निघाल्याशिवाय राहाणार नाही.  चिलीवर सध्या १६ अब्ज डॉलरचा परकीय कर्जाचा बोजा आहे.  हे परकीय कर्ज फेडणेही वरील अरिष्टातून मार्ग निघाल्याशिवाय चिलीला शक्य होणार नाही.

नऊशे कोटींची फळे निर्यात

गेल्या वर्षी सुमारे नऊशे कोटी रुपयांची फळे चिलीमधून निर्यात झाली.  यावर्षी हा आकडा अकराशे कोटीवर जाण्याचा संभव होता.  यात ७० टक्के वाटा द्राक्षांचाच आहे.  चिलीतील फळबागांचा विस्तार हा प्रामुख्याने गेल्या दहा-बारा वर्षातच घडून आलेला आहे.  हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.  चिलीची प्रसिद्धी तांब्याच्या धातूच्या निर्यातीबद्दल आहे.  तांब्यानंतर द्राक्ष पिकाने निर्यातीचा विकास केला होता.  चिलीत द्राक्षाच्या धंद्यात सुमारे साडेचार लक्ष लोक काम करतात. आता यामुळे किती लोकांच्यावर बेकारीचा प्रसंग येईल, हे सांगणे अवघड आहे.  परंतु चिलीतील नव्वद टक्के फळांची निर्यात अमेरिकेत होत असे हे लक्षात घेतल्यास याचे दूरगामी परिणाम चिलीच्या अर्थव्यवस्थेवर होणार हे उघड आहे.  द्राक्षाचा हंगाम जवळ जवळ संपत आलेला आहे परंतु सफरचंदाचा हंगाम आता कुठे सुरू होण्याच्या बेतात आहे.  अनेक परदेशी कंपन्यांनीही चिलीच्या फळबागांत गुंतवणूक केलेली आहे.  त्यांच्याही आर्थिक परिस्थितीवर या घटनेचा परिणाम होणार आहे.  परंतु पुढील वर्षी हे अरिष्ट दूर होईल असा त्यांना विश्वास वाटतो.

चिलीबाबत ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात फळबागा वाढविण्यास किती वाव आहे, याची कल्पना येते.  आपल्याकडे फारशी प्रचलित नसलेली अनेक प्रकारची फळे हवामान पाहून व अभ्यास करून आपल्याकडे लावता येणे शक्य होणार आहे.  योग्य दिशेने प्रयत्‍न केले तर, चिलीप्रमाणेच प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रातूनही फळांची आणि द्राक्षांची निर्यात होऊ शकेल. कोकणातील हापूस आंबा परदेशात खूपच लोकप्रिय झालेला आहे आणि सध्या त्यापेक्षा दहा पटीने अधिक आंब्याचे उत्पादन वाढविण्यास कोकणात वाव आहे.  पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात द्राक्षांची शेती स्थिरावू पाहात आहे आणि विस्ताराला किमान शंभरपट वाव आहे.  गुणवत्तेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील द्राक्षे खूपच सरस व आकर्षक आहेत, चवही चांगली आहे.  बोरांच्या बाबतीतही द्राक्षाप्रमाणेच शक्यता आहे.  महाराष्ट्रातील फळबागायतदारांनी आणि कृषि विद्यापीठातील तज्ज्ञांनी व सरकारी प्रतिनिधींनी चिलीस भेट देऊन तेथील फळबागांच्या धंद्याचा आणि विस्ताराचा अभ्यास केला पाहिजे.  त्यांना गुणवत्तेची फळे उत्पादन करून एवढ्या प्रचंड प्रमाणात फळांची निर्यात वाढविणे कसे शक्य झाले याची माहिती घेतली पाहिजे.