महाराष्ट्रातील दुष्काळ - ११२

भविष्याच्या दृष्टीने शेतकर्‍याला काही शिकवावे

मी असे म्हणतो की ह्याबाबतीत आपण खास लक्ष दिलेले नाही.  शेतीबाबतची कायदेशीर शिस्त आपण लोकांना लावलेली नाही.  त्यांना प्रशिक्षण दिलेले नाही; त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना ते पटवून दिलेले नाही.  ज्या पद्धतीने सध्या आपण काम करीत आहोत, त्यामध्ये तोटे किती आहेत, आणि शेवटी आपले अस्तित्व त्यात कसे टिकून राहणार आहे, अशा वेळेस आपणाला शेतकर्‍याकडे जाऊन काही काम करता येईल का ?  शेतकर्‍याची माल मालकी अबाधित तशीच ठेवून, गावातील लोकांनी एकत्रित येऊन आपली सामुग्री एकत्रित आणून को-ऑपरेटीव्हच्या पद्धतीने शेती केली तर ती प्रभावी होऊ शकेल काय ?  अशा प्रकारचे काही प्रश्न उभे राहात आहेत.

केवळ काही मूलभूत प्रश्न आपल्या समोर ठेवावेत म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे.  एकूण या सर्व प्रश्नांचा विचार साकल्याने आपल्याला करावा लागेल.  शिक्षणक्षेत्रामध्ये मी काम करीत आहे.  तेथे मला असे वाटते की आपण लोकांना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून द्यावेत.  शेतीमध्ये जे उत्पादन होते त्याच्या वरची कारखानदारी जर वाढली तर निव्वळ शेतीवरच जो लोड आहे तो आपल्याला डिस्ट्रिब्यूट करता येईल आणि अशा पद्धतीने निव्वळ शेतीवर अवलंबून रहाणार्‍या लोकांचे परसेंटेज कमी झाल्याशिवाय हा प्रश्न सुकर होईल असे मला वाटत नाही.  कारण शेवटी सगळे प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे आहेत आणि म्हणून आपल्याला मूलभूत अशा पद्धतीने विचार करावा लागेल.  शेती-औद्योगिकीकरणाबात यशवंतरावजींचे स्वप्न होते.  आपल्याकडे ते अस्तित्वात कसे आणता येईल ?  उद्योग आणि शेती या दोघांची सांगड घालून; शेती हा उद्योगच बनला पाहिजे.  आणि त्यासाठी सगळी साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत.  याचा आपण मूलभूत विचार करावा.  एवढे बोलून मी आपली रजा घेतो.