यशवंत चिंतनिका २

विचारांचा संगम

संगम जिथे कुठे झालेला असेल, ते ठिकाण माझ्या आवडीचे असते. मला ते रम्य वाटते. स्फूर्ती देणारे, जीवनाचा एक वेगळाच अर्थ सांगणारे असे भासू लागते. नद्यांचा संगम झालेले स्थान हिंदु्स्थात पवित्र मानले जाते, पण ते धार्मिक अर्थाने. मला ते भौतिक दृष्टीने पवित्र वाटते. ते मनाला काही वेगळेच सांगत असते. दोन नद्या एकीत एक मिसळतात, तेव्हा दोन शक्तींचे मीलन झाल्याचे ते दर्शन असते. दोघी एक होऊन, एकरूप, एकजीव होऊन पुढे जातात आणि हजारोंचे संपन्न करीत असतात.

माणसामाणसांचे असे मीलन होईल, विचारांचा संगम होईल आणि माणसं एकजीव बनून कर्तृत्व करतील, तर सारेच सुखाने नांदतील, त्यांचे जीवन संपन्न बनेल, राग, व्देष, स्पर्धा, शत्रुत्व त्या संगमात मिसळून-विरघळून जाईल आणि विशुध्द जीवनाचा स्त्रोतच पुढे जात राहील, असे निसर्गाने निर्माण केलेल्या संगमाच्या ठिकाणी उभे राहिले, की माझे मन सांगू लागते.