महाराष्ट्रातील दुष्काळ - ७८

दुष्काळ आणि पाऊस  :

आपल्या देशात विपुल जलसंपत्ती आहे.  परंतु त्याचे वितरण मात्र समान नाही.  वास्तविक सरासरी १२०० मि.मी. पावसाचे संपूर्ण देशात समान वाटप झाले असते तर संपूर्ण देशाच्या शेतीची गरज भागू शकली असती.  परंतु तसे झालेले नाही.  संपूर्ण देशाचा २८ टक्के भागच चांगल्या पावसाखाली मोडतो आणि बाकीचा ७२ टक्के भाग मात्र कमी पावसाखाली येतो.  यापैकी ३० टक्के भाग तर सरळ दुष्काळी गणला गेला असून उर्वरित ४२ टक्के भाग पावसाच्या मेहेरबानीवर अवलंबून आहे.  उत्तरेकडे भरपूर पाऊस पडून नदीच्या पुरामुळे दरवर्षी लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली बहून महापुराचे थैमान चालू असतानाच भारताच्या अन्य भागात दुष्काळ अथवा निमदुष्काळ पिके करपून जाऊन लोक पाण्यासाठी हैराण झाल्याचे दिसत असतात.  इतकेच नव्हे तर पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही आणि नदी खोर्‍यात जागोजागी बांधलेल्या लहान मोठ्या धरणांचा आश्रय घ्यावा लागतो.  गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात काही भागात अती तीव्र दुष्काळ होता आणि शासनास या दुष्काळात कोट्यावधी रुपये, लोकांना पाणी पुरविण्यावर खर्च करावे लागले.  धरणातील सर्व पाणी त्यांच्यासाठी राखून ठेवावे लागले आणि हे पाणी टँकरद्वारे गावोगावी न्यावे लागले.  हीच परिस्थिती गुजरात, राजस्थान आणि अन्य राज्यात वारंवार निर्माण झालेली दिसून येते.  अशाप्रकारे या देशात उत्तरेकडील विपुल जलसंपत्ती समुद्राकडे वाहून जात असताना दक्षिणेकडे पावसाचा प्रत्येक थेंब थोपवून ठेवण्याचा सतत प्रयत्‍न चालू असतो.

उत्तरेकडे ऍल्युव्हियल माती (जलील निपेक्ष माती) असल्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची फार मोठी शक्ती आहे.  व या भागात कालव्याद्वारे जमिनीच्या भूगर्भात साठलेले पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कूपनलिकेद्वारे हे पाणी जमिनीवर काढून घेण्यास भरपूर वाव आहे.  परंतु उर्वरित ७ टक्के - ८ टक्के भागात ही परिस्थिती अत्यंत वेगळी आहे.  बहुतांशी भाग मुरमाड व खडकाळ असल्यामुळे भूगर्भात सामान्यतः ४ टक्के ते ५ टक्के पेक्षा जास्त पाणी साठवून ठेवता येऊ शकत नाही.  म्हणून अशा भागात जागोजागी बांध बांधून पावसाचे वाहून जाणारे पाणी थोपवून धरून त्याचा दुष्काळाशी सामना करण्यास उपयोग केल्याशिवाय गत्यंतर नाही.  

ही विसंगती पाहाता देशाच्या सर्वसामान्य हिताच्या व विशेषतः दुष्काळी भागाच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

देशातील दुष्काळ

आपल्या देशाच्या दुष्काळाचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येईल की, या देशात ११ व्या शतकापासून आतापर्यंत ५० मोठे दुष्काळ होऊन गेले, पूर्वीच्या काळात वाहतुकीचे साधन नव्हते.  त्यामुळे दुष्काळात भूकबळी पडून हजारो लोक मृत्युमुखी पडल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.  केवळ १८६० पासून १९०८ पर्यंत इंग्रज राजवटीत म्हणजेच ४९ वर्षात २० मोठे दुष्काळ होऊनही गेले आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या काळात आपल्या देशात काही मोठाली धरणे व कालवे बांधण्यात येऊन धान्य वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे पसरविण्यात आले.  चालू वर्षात देखील संपूर्ण देशात विशेषतः उत्तरेकडे जेथे दुष्काळाची फारशी झळ पोहचत नसते अशा ठिकाणी देखील भयानक दुष्काळ पडला असून संपूर्ण देशाची यंत्रणा या कामी गुंतल्याचे दिसून येत आहे.  अशाप्रकारे १८ व्या शतकाच्या शेवटापासून १९ व्या दशकाच्या सुरवातीच्या काळात रशियन शास्त्रज्ञ श्री शिमीट निको यांनी म्हटल्याप्रमाणे १८०० ते २००० वर्षाच्या पावसाच्या वर्गातून पहिली ५७० वर्षे पूर्ण झाली असून चालू शतकात पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याचे दिसून येत आहे.  पूर्वी नेमके ७ जून रोजी पाऊस पडत असे.  आज ही गोष्ट इतिहासात जमा झालेली आहे. पूर्वी पावसाची कालमर्यादा ४ महिन्याची असावयाची.  काळ्या मातीत जागोजागी डेरे असल्याचे दिसून यावयाचे.  पूर्णा कालवा ज्या ज्या भागात आलेला आहे तो भाग एके काळी डेर्‍यांसाठी प्रसिद्ध होता.  परंतु आज त्याच भागात कालव्याचे पाणी येऊन डेरे दिसत नाहीत.  याचाच अर्थ पावसाचे प्रमाण वरचेवर कमी कमी होत चालले आहे.  सन १९७१  च्या दुष्काळानंतर या पावसाचे प्रमाण १०० ते १५० मी.मी. (४ टक्के ते ५ टक्के) कमी झाल्याचे दिसून येते.  हा पाऊस कमी का झाला याच्या विश्लेषणात इथे जाण्याची गरज नाही.  मात्र ही वस्तुस्थिती आहे हे मानले पाहिजे.

निसर्गात अशाप्रकारे बदल होत असताना मानवास अजिबात पाणी मिळू नये अशी अवस्था कदापि येऊ शकणार नाही व त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही.  मात्र त्यासाठी देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य वितरण व जपणूक व योग्य वापर होणे आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी जर सांभाळल्या गेल्या नाहीत तर मात्र मानवास पाण्यावाचून तरसावे लागेल यात शंका नाही.