• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

महाराष्ट्रातील दुष्काळ - ९०

१४.  इथे हरला दुष्काळ - आडगाव प्रकल्प

निवेदक :  सतीश कामत
उपसंपादक, महाराष्ट्र टाइम्स
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गावातील सर्व निर्णय आपापसातील चर्चेनंतर एकमताने घ्यायचे असा अलिखित पायंडा होता, म्हणूनच आडगावचा पाणी अडवून, जिरवून फायदेशीर शेती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला.  मॉडेल :  ग्रामीण विकासाचे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोजगार हमी योजनेवरील कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलण्यात येईल, अशी घोषणा अलीकडेच करताना मुख्यमंत्री शरद पवार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील आडगावच्या प्रयोगाचा उल्लेख केला.  ग्रामीण विकासाच्या योजनांची दिशा ठरविताना या प्रयोगाचे 'मॉडेल' डोळ्यांसमोर ठेवावे ही सरकारी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची अपेक्षा असावी.  आडगावचा प्रयोग आणि आजवरचे फलित काय आहे.  त्याची ही नोंद ....
आडगाव - खुर्द.  औरंगाबादपासून तीस कि.मी. अंतरावर थोडे आडवाटेलाच वसलेले हे खेडेगाव.  राज्यातील ४० हजार खेडेगावांपैकी एक.

मोठे जमीनदार नाहीत

तेराशे-चौदाशेंची वस्ती.  सव्वातीनशे कुटुंबे.  पैकी ४० भूमिहीनांची.  उरलेल्यांपैकी निम्म्यांकडील जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी.  चार हेक्टरपेखा कमी.  जमीन असलेल्यांचे प्रमाण ८५ टक्के.  म्हणजे मोठे जमीनदार नाहीतच.  सरासरी पाऊसमान तसे ७२ सें.मी. गेल्या दोन वर्षात पाऊस सरासरीपेक्षा थोडा जास्तच.  पण त्यापूर्वीच्या तीन-चार वर्षात हेच प्रमाण सरासरी ४० सें.मी. इतके कमी.

मात्र पाऊस जास्त पडो की कमी, उन्हाळ्यात किंबहुना डिसेंबरपासूनच पाण्याची चणचण.  गावात दिडशे विहिरी.  पण उन्हाळ्यात कोरड्या.  पिंपरीहून टँकरने होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आडगावची तहान भागणार.  कपडे धुण्यासाठी शेतजमिनीतील डबकी शोधत बायका फिरणार.  ही पाणीटंचाई पार १९७२ च्या दुष्काळापासून सवयीची झालेली  !

चित्र पालटले

आज हे चित्र पालटले आहे.  यावर्षी आडगावातील रहिवासी उन्हाळ्यात आपल्या विहिरीचे पाणी पिणार आहेत.  खळखळणार्‍या ओढ्यावर बायका धुणी धुणार आहेत.  चार घटका गप्पा माराव्यात म्हणून दिवसा गावात गेलात तर रिकामे कुणी आढळणार नाही.  रोजगार हमीवर कामे शोधण्यासाठी गावाबाहेर माणसे गेली म्हणून नव्हे !  गावातील शेतीतच इतके काम असणार आहे की, गप्पांना फुरसत मिळू नये.

गावकर्‍यांना आजही अनेकदा हे स्वप्नच वाटते.  हे स्वप्न नाही तर वास्तव आहे, याचे भान येते तेव्हा त्यांचे हृदय गावाबद्दलच्या अभिमानाने भरून येते, आणि कृतज्ञतेनेही... हा मार्ग दाखविणार्‍या आणि त्यासाठी पैशाची मदत पुरविणार्‍या मराठवाडा शेती साहाय्य मंडळाच्या जवाहर गांधी आणि विजय बोराडे यांच्याविषयीच्या !